Nagpur News: 'आरंभ' : निरोगी बालपणाचा मजबूत पाया; गृहभेट, पालकसभा, मेळाव्यातून आरोग्यावर मार्गदर्शन
esakal April 13, 2026 02:45 PM

नागपूर: समाज सुदृढ हवा असेल तर बालके सुदृढ हवीत. त्यासाठी एखादे मूल या जगात येण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत एक हजार दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. या दिवसांत बालकांचा पूर्णपणे विकास होतो आणि त्यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. बालकांचे बालपण निरोगी करण्यासाठी युनिसेफ व सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, महाराष्ट्र शासनाचा एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभाग यांनी ‘आरंभ’चा प्रकल्प हाती घेतला आहे.

बालकांच्या विकासाचा ‘आरंभ’ त्याची जगात येण्याची चाहूल लागताच होतो. मात्र, आपल्याकडे एखाद्या महिलेला बाळ होणार आहे हे किमान तीन महिने इतरांना सांगितले जात नाही. नेमकी याच कालावधित बाळाची महत्त्वाची वाढ होत असते. त्यामुळे दिवस असल्याची चाहूल लागताच शासकीय रुग्णालयात नोंदणी करण्यात यावी, आई होणाऱ्या महिलेने संपूर्ण नऊ महिने आनंदात घालवावे, पुरेसा पोषण आहार घ्यावा यासारखे अनेक विषयांवर ‘आरंभ’च्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन केले जाते.

Nagpur News: ब्रेकअपच्या नैराश्यात तरुणाने नागपुरात हॉटेलमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन

यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्करच्या माध्यमातून हे काम करीत आहेत. गृहभेट, पालकसभा, पालक मेळावा यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या संपूर्ण विकासावर, त्यांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. गृहभेटीच्या माध्यमातून दिवस असल्यापासून ते बाळ तीन वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधित घरच्यांनाही आईची व बाळाची काळजी घेण्याविषयी व त्यांच्या आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते.

पालक सभेच्या माध्यमातून मूल हे फक्त आईची जबाबदारी नाही, तर कुटुंबातील सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे, हे पटवून दिले जाते. सहा महिन्यातून एकदा होणाऱ्या पालक मेळाव्यातून सकस आहार, बालकांचे योग्य संगोपन आणि खेळाच्या माध्यमातून मुलांना कसे शिकवावे, त्यांचा खेळातून कसा विकास होतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.

या सर्व उपक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्करची भूमिका महत्त्वाची असून संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १ लाख ८ हजार ५०७ अंगणवाडी सेविका, ७४ हजार ७४६ मदतनीस आणि ७० हजार २६७ आशा वर्कर यासाठी काम करीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू असून, ‘आरंभ’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामाची पहाणी करण्याकरिता युनिसेफच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील खरांगणा, मोरांगणा आणि काचनूर या गावांची पहाणी करण्यात आली.

Akola News: काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा ३६.५९ टक्क्यांवर; उन्हाळ्यात वाढती मागणी, पाणी जपून वापराचे आवाहन

यावेळी सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेच्या सामुदायिक वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. सुबोध गुप्ता, आरंभ प्रकल्प समन्वयक डॉ. अमृता बंडल, जिल्हा संपर्क अधिकारी सोनाली कांबळे, सविता दखने, मंदा लोहट, जिल्हा प्रशिक्षण व संपर्क आधिकारी पुनम कावडे, डॉक्युमेंटेशन अधिकारी गौरव पेढे, वेदांग चौधरी, मेघाराणी लाखे, वर्धेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरशगे आणि पर्यवेकशिका ललिता आसत्कार, संम्राट खंदार व राज बसेकर उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.