Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?
esakal April 17, 2026 12:45 AM

लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकांवर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर असा विनोदी टोला लगावला की, सभागृहात एकच हास्यकल्लोळ उसळला. वायनाडच्या खासदार प्रियंका यांनी सांगितले की, काँग्रेस महिला खासदारांसाठी आरक्षणाला पूर्ण पाठिंबा देते, पण खरी चर्चा आरक्षणावर नव्हे तर या विधेयकातून उमटणाऱ्या राजकीय प्रश्नावर आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, महिलांना आरक्षण देण्याचा हा निर्णय हा केंद्रातील एनडीए सरकारसाठी एक राजकीय हुकमी पत्ता आहे. निवडणुकांमध्ये फायदा मिळवण्यासाठी तो वापरला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या भाषणाचा उल्लेख करताना प्रियंका म्हणाल्या की, भाजप महिलांच्या हक्कांचा पुरस्कर्ता राहिला आहे, असे ते म्हणतात. अमित शाह बोलत असताना प्रियंका यांनी त्यांच्याकडे पाहिले. शाह हसत होते. यामुळे प्रियंकांनाही हसू आवरले नाही. त्या म्हणाल्या, “ते हसत आहेत... गृहमंत्री हसत आहेत. तुम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे.” आणि पुढे त्यांनी चाणक्याचा संदर्भ देत म्हटले, “जर चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता आणि तुमच्या धूर्तपणाचे कौतुक वाटले असते.”

या एका वाक्यात सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये हास्याची लाट पसरली. प्रियंका गांधी आणि अमित शाह दोघेही हसत होते.

Narendra Modi: विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत महिलांनी धडा दिला; क्रेडिट घ्या, पण महिला आरक्षणाला पाठिंबा द्या; मोदींची मोठी ऑफर

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उल्लेख करताना प्रियंका यांनी सांगितले की, त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत महिला आरक्षणाच्या निर्णयाला नेहमी विरोध झाल्याचे सांगितले होते. त्यावर प्रियंका म्हणाल्या, “मला या विषयाला ऐतिहासिक संदर्भ द्यायचा आहे. पंतप्रधानांनी कोणी हे थांबवले आणि हा निर्णय ३० वर्षे कसा लांबला याबद्दल सविस्तर सांगितले. सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्यांना हे कदाचित आवडणार नाही, पण याचा ऐतिहासिक आधार एका नेहरू नावाच्या व्यक्तीशी जोडलेला आहे. काळजी करू नका, हे ते नेहरू नाहीत ज्यांच्यापासून तुम्ही दूर पळता. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी १९२८ मध्ये एक अहवाल तयार करून काँग्रेस कार्यकारिणी समितीसमोर सादर केला होता, ज्यात १९ मूलभूत हक्कांची रूपरेषा होती.”

प्रियंका पुढे म्हणाल्या, “१९३१ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराचीत काँग्रेसचे अधिवेशन झाले. तेथे हा ठराव मंजूर झाला. येथूनच महिलांचे समान हक्क देशाच्या राजकारणाचा भाग बनले. ‘एक मत, एक नागरिक, एक मूल्य’ हे तत्त्वही प्रस्थापित झाले.” त्यांनी नमूद केले की, अमेरिकेसारख्या देशांना या हक्कासाठी १५० वर्षे वाट पाहावी लागली आणि संघर्ष करावा लागला, तर भारताने महिलांना राजकीय हक्क देण्याच्या दिशेने अद्वितीय पाऊल उचलले.

महिला आरक्षणाचे श्रेय देताना प्रियंका गांधी यांनी सांगितले की, नगरपालिका आणि पंचायतींमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद सर्वप्रथम त्यांच्या दिवंगत वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सभागृहात मांडली होती.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.