आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी घोडदौड सुरू आहे. आता सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला तर गुणतालिकेत पहिलं स्थान गाठणार आहे. त्यामुळे हा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.कर्नाटकचे केएल राहुल आणि करूण नायर हे दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार आहेत. असं असताना सामन्यात आरसीबीचा संघ नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. आरसीबी संघ या सामन्यात हिरवी जर्सी घालून मैदानात उतरेल. 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा ट्रेंड फॉलो करत आहे. त्या मागे कारणंही तसंच आहे. चाहत्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आरसीबी ही हिरवी जर्सी घालते.
आयपीएल 2011 पासून आरसीबीने प्रत्येक पर्वात हिरवी जर्सी परिधान करून एक सामना खेळला आहे. यंदाचं हे 16वं वर्ष आहे. आरसीबी संघाची नवीन जर्सी खूपच आकर्षक आहे. या जर्सीच्या टी-शर्टमध्ये हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे. हिरव्या जर्सीतील आरसीबीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.आरसीबीने आतापर्यंत हिरवी जर्सी घालून 15 सामने खेळले आहेत. आरसीबीने यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 9 सामने गमावले आहेत. उर्वरित 1 सामना अनिर्णित राहिला. मागील हंगामात राजस्थानविरुद्ध हिरव्या जर्सीत खेळलेल्या आरसीबीने मोठा विजय नोंदवला होता.
हिरव्या जर्सीमधील आरसीबीची कामगिरी आकडेवारीवरून खूपच खराब असल्याचं दिसत आहे. पण याच जर्सीमधील विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी प्रभावी आहे. त्याने आतापर्यंत हिरव्या जर्सीमध्ये त्याने 14 सामने खेळून एकूण 502 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध विराट कोहलीने 109 धावांची खेळी केली होती.
आरसीबीचे सीईओ राजेश मेनन म्हणाले, “एक प्रमुख क्रिकेट फ्रँचायझी म्हणून कार्बन-न्यूट्रॅलिटी साध्य करणे सोपे नव्हते. यासाठी अनेक वर्षांची मेहनत आहे. आमची हिरवी जर्सी निसर्गाप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवते. आम्हाला आशा आहे की, हे पाऊल पाहून आमचे लाखो चाहतेसुद्धा पर्यावरणाबद्दल जागरूक होतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील.”