IPL 2026: हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येत नाही? इरफान पठाणने केला हल्लाबोल
admin April 24, 2026 08:26 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू पाहिले तर कोणालाही घाम फुटेल. इतके दिग्गज खेळाडू या संघात आहेत. मात्र असं असूनही मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होत आहे. कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी स्थिती आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 5 सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सनला 103 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे हा मानहानीकारक पराभव पचवणं क्रीडाप्रेमींना कठीण जात आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या काही निर्णयावर टीकास्त्र सोडलं आणि त्याला त्याची जबाबदारी घेण्याचा सल्लाही दिला.

इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितलं की, हार्दिक पांड्याने युवा गोलंदाज कृष भगतकडे 16 आणि 20वं षटक सोपवलं. त्याला सॅमसनविरुद्ध गोलंदाजी करण्यास भाग पाडलं. हा निर्णय चुकीचा होता असं इरफान पठाणने सांगितलं, समोर संजू सॅमसन होता आणि शतकाच्या उंबरठ्यावर असताना कर्णधार हार्दिक पांड्याला ही जबाबदारी स्वत: घ्यायला हवी होती. कृष भगतच्या दोन षटकात 31 धावा गेल्या. त्यामुळे संघाचं मोठं नुकसान झालं.

इरफान पठाणने युट्यूब चॅनेलवर हार्दिक पांड्यावर चर्चा करताना सांगितलं की, ‘तुम्ही 16वं षटक असा गोलंदाजाकडे सोपवत आहात जो आयपीएलमध्ये दुसरा सामना खेळत आहे. तेही चांगल्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनविरुद्ध.. हा निर्णय काही योग्य नव्हता. इतकंच काय तर तुम्ही शेवटचं षटकही त्याच गोलंदाजाला समोर संजू सॅमसन असताना दिलं. हे काही बरोबर नाही. तुला जबाबदारी घ्यायला हवी होती. कर्णधार म्हणून तुला सक्रिय असायला हवं होतं.’

इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयपीएल 2023 नंतर हार्दिक पांड्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. त्याने त्याच्या शैलीत बदल केल्याने वेगवान गोलंदाजांसमोर चांगली कामगिरी करत आहे. पण फिरकीपटूंसमोर त्याची कामगिरी निराशाजनक आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.