सांगली जिल्ह्यत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले आठ मुलं बुडाली आहेत, या घटनेमध्ये एका वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान त्यातील सर्वांना वाचविण्यात यश आले, मात्र एका वीस वर्षीय मुलीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे तर ती मुंबई येथे वास्तव्यास होती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भाळवणी येथे शिकलगार मळ्यामध्ये लग्न समारंभानिमित्त मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते. मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम सुरू असताना काहीजण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये 8 ते 10 लहान मुले व मुली होत्या. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा होते. मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभा होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली. या सर्व गोंधळामध्ये सात ते आठ मुले बुडाली. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
यावेळी बुडालेल्या सात मुलांना वाचवण्यात यश आले. या मुलांना वाचवत असताना काही पालकांना पोहता येत नव्हते. ते सुद्धा या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरले होते. यावेळी आपले वडील बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर नदी काठावर असलेल्या फिरदोस जाकीर शिकलगार या मुलीने वडिलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली. परंतु दुर्दैवाने वडिलांना वाचवण्याऐवजी फिरदोस पाण्यामध्ये बुडाली, सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अत्यवस्थ होते त्यांना विट्याच्या खाजगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या वीस वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिचे मूळ गाव कोरेगाव होते तर ती मुंबई येथे वास्तव्यास होती, या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.