Tamil Nadu election results 2026: तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पक्षाचा धुव्वा, डावे, बसपानंतर हा पक्षही संपण्याच्या मार्गावर? धक्कादायक निकालाने टेन्शन
Tv9 Marathi May 04, 2026 01:45 PM

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. दोन्ही पक्षात चुरशीची लढत सुरू आहे. त्यामुळे या राज्यात कुणाची सत्ता येणार हे आताच सांगता येणार नाही. मात्र, थोड्यावेळात या राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. तर केरळममध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सत्तेत जाण्याची शक्यता आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता मिळताना दिसत आहे. तर तामिळनाडूत विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांचीच सत्ता येताना दिसत आहे. मात्र, या राज्यात एका सर्वात जुन्या पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. राज्यात तीन मुख्यमंत्री देणाऱ्या या पक्षाचा धुव्वा उडाला आहे. तामिळनाडूत भाजपला मात्र अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

तामिळनाडूत डीएमकेला 50, टीव्हीकेला 40 आणि एआयडीएमकेला 25 जागा मिळताना दिसत आहे. टीव्हीके ही पार्टी दाक्षिणात्या सुपरस्टार थलपति विजय यांची आहे. या पक्षाने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थात सत्तेच्या दिशेने हा पक्ष जाताना दिसत नाहीये. मात्र, टीव्हीकेसाठी हे यशही मोठं आहे. सुरुवातीच्या पोस्टल मतांच्या कलामध्ये या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. डीएमके पोस्टल मताच्या कलामध्ये सत्तेच्या दिशेने जाताना दिसत आहे. ही स्टॅलिन यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

चार मुख्यमंत्री देणारा पक्ष…

सर्वात चिंतेची बाब म्हणजे तामिळनाडूत तीन वेळा मुख्यमंत्री देणारा एआयडीएमके पक्ष पिछाडीवर पडल्याचं दिसत आहे. पोस्टल मतात हा पक्ष मागे पडला आहे. एआयडीएमकेला अवघ्या 25 जागा मिळताना दिसत आहे. ही या पक्षाची गेल्या काही दशकातील सर्वात सुमार कामगिरी आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी एआयडीएमकेची स्थापना केली होती. त्यांना राज्यातील जनतेने मुख्यमंत्री केलं होतं. त्यानंतर याच पक्षाकडून जयललिता यांना मुख्यमंत्रीपद झाल्या होत्या. 1991 ते 2016 पर्यंतच्या कार्यकाळात अनेकवेळा त्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यानंतर जयललिता यांच्या निधनानंतर के. पलानीस्वामी मुख्यमंत्री झाले होते. 2017 ते 2021 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले होते.

डावे, बसपाच्या मार्गावर…?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी नावाच्या वादळाने डाव्यांना सत्तेतून बाहेर काढलं. आज डाव्यांची अवस्था दयनीय आहे. पश्चिम बंगालमधून डावे जवळजवळ हद्दपार संपले आहेत. हा पक्ष संपलाय असंच म्हटलं जात आहे. तर, उत्तर प्रदेशमधून भाजपने बसपाला हद्दपार केलं आहे. तसंच आता तामिळनाडूत एआयडीएमकेची अवस्था होताना दिसत आहे.

चमत्कार घडणार?

दरम्यान, एआयडीएमकेच्या वाट्याला कमी जागा येताना दिसत असल्या तरी एआयडीएमके राज्यात कमी जागा मिळवूनही किंगमेकरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. राज्यात त्रिशंकू विधानसभा झाली तर थलपती विजय यांच्याशी हातमिळवणी करून एआयडीएमके सत्तेत जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.