पुणे : एकीकडे भोर तालुक्यातील नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे (Nasrapur Girl Death Case) राज्यभर संतापाची लाट उसळली असताना पुण्यात तशीच आणखी एक घटना घडली आहे. पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून नऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पर्वती भागातील नागरिकांनी केला. वेळीच नागरिकांनी ही घटना पाहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मात्र पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आता लोकांनी मोठी गर्दी केली असून लोकांमध्ये मोठा संताप उसळल्याचं दिसून येतंय. या घटनेबाबत पोलीस नेमकी माहिती देत नाहीत.
पर्वती भागात घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असून लोक पर्वती पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करत आहेत. एवढी मोठी गर्दी पाहता आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत. यामुळे पर्वती भागातील वातावरण मात्र तणावग्रस्त झाल्याचं दिसतंय.
पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षांच्या व्यक्तीने नऊ वर्षांच्या बालिकेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बालिकेकडे पाहून अश्लील इशारे करण्यात आले आणि जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचं दिसतंय.
पुण्यातील या घटनेवर ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यानी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "राज्यात अशा घटना वारंवार वाढत असून त्याची तीव्रता वाढताना दिसत आहे. नसरापूरसारखी घटना घडली असतानाही त्यावर कडक कारवाई केली जात नाही हे दुर्दैव. ज्या ठिकाणी वर्किंग पेरेंट्स आहेत, त्यांच्या मुलामुलींचं भविष्य काय? पाळणाघरात मुलं ठेवली जात आहेत, परंतु ती सुरक्षित आहेत का? सरकार या सगळ्या घटनांवर कोणते कडक पाऊल उचललं जात आहे? महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संबंधी एकतरी बैठक घेतली का? या सगळ्याचं उत्तर नाही असंच आहे. सगळीच प्रश्न जर लोकांवर सोडत असाल तर ते दुर्दैव आहे. तुम्ही सरकार म्हणून काय करताय? लोकांच्या संतापाचा कडेलोट होण्याची वाट का पाहताय?"