Weather Updates : नव्या संकटासाठी तयार राहा… अरबी समुद्रातच मोठा खेळ, 48 ते 72 तासांत… हवामान विभागाचा इशारा काय?
Tv9 Marathi May 06, 2026 11:45 AM

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी पावसाचा खेळ, कधी गारा तर कधी कडाक्याचं , भाजून काढणारं ऊन, नागरिकांची अक्षरश: परीक्षा पाहतोय. सध्या तर उन्हाचा कडाका वाढला असून अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच आता हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. महामुंबई परिसरातील पारा पुन्हा चढू लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज, म्हणजेच 6 मेपासून मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे 6 ते 8 मे दरम्यान मुंबईत कमाल तापमानाचा पारा 36 अंश किंवा त्यापुढे जाण्याचा अंदाज आहे. वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानाच 36 अंशांपलीकडे वाटटाल होण्याची शक्यता आहे.

सध्या वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून असून त्यानंतर खालच्या थरात उत्तर तसेच ईशान्य पट्ट्यातून वाहणारे वारे हे वारे उष्ण असणार आहेत. तसेच महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्ण वारे खालच्या थरात कोंडले जाऊन तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती दोन ते तीन दिवस महामुंबई परिसरात जाणवू शकते, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:च्या काळजी घ्यावी, भरउन्हात बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या असं आवहन करण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात लवकरच चक्रीवादळ प्रणालीची शक्यता; महाराष्ट्रावर परिणाम कमी

या आठवड्याच्या अखेरीस अरबी समुद्रात चक्रीवादळ प्रणाली निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही प्रणाली केरळ किनारपट्टीजवळ तयार होण्याचा अंदाज असून पुढील काही दिवसांत तिची स्थिती स्पष्ट होईल. मात्र, या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत. गेल्या दहा वर्षांत 2015 ते 2024 या कालावधीत भारतीय समुद्र क्षेत्रात मान्सूनपूर्व काळात एकूण दहा चक्रीवादळे निर्माण झाली आहेत. मात्र 2015, 2018 आणि 2024 या वर्षांत या कालावधीत कोणतेही वादळ निर्माण झाले नव्हते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्मितीची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मे महिन्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरच्या शेवटी अशा प्रणाली तयार होण्याचे प्रमाण अधिक असते. सध्या अरबी समुद्रातील वातावरणीय परिस्थिती चक्रीवादळ निर्मितीस पोषक होत असून पुढील ४८ ते ७२ तासांत अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थंड हवेचे ठिकाण चिखलदऱ्यामध्ये शुकशुकाट, उन्हाचा पारा चढल्याने पर्यटकांनी फिरवली पाठ

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथील तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेला आहे. अतिशय कडक उन्हामुळे पर्यटकांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली असून चिखलदरा पर्यटन स्थळी सर्वत्र शुकशुकाट दिसत मिळत आहे. मे महिना हा सुट्ट्यांचा काळ असल्याने आधी चिखलदऱ्यात मोठी गर्दी असायची. परंतु, यावर्षी तापमान 42 अंशांच्या वर गेल्याने दुपारी बाहेर पडणे कठीण झाले आहे. पर्यटकांची कमतरता जाणवत आहे. खरंतर जास्त उष्णतेमुळे पर्यटक चिखलदऱ्याला भेट देणे टाळत आहेत, त्यामुळे पर्यटन व्यवसाय प्रभावित झाला आहे. मात्र यावर्षी या ठिकाणी तापमान वाढलं आहे त्यामुळे एकही पर्यटक या ठिकाणी दिसून येत नाही सर्व पर्यटन स्थळावरील पॉईंटवरील दुकाने बंद असून या ठिकाणी पर्यटन स्थळ ओस पडलं आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.