Mumbai: गणेशोत्सवात ज्या गाण्याशिवाय लालबागचा राजाची मिरवणूक (Lalbaghcha Raja) अपूर्ण मानली जाते, त्या ' पालखी निघाली राजाची ' या गाण्याचे लोकप्रिय गायक व संगीतकार नितीन मोरजकर (Nitin Morajkar) यांचं निधन झालं आहे. त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. लालबागचा राजाच्या मिरवणुकीत प्रत्येक गणेश भक्तांच्या ओठावर असणार लोकप्रिय गाणं जाणाऱ्या गायकाच्या निधनाने संगीत विश्वासह गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात ' पालखी निघाली राजाची' (Palkhi Nighali Rajachi) हे गाणं मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने वाजवलं जातं. मुंबईच्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत या गाण्याला खास महत्त्व आहे.
मुंबईतील लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वात मोठी मिरवणूक मानली जाते. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी हजारो गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. या मिरवणुकीत 'पालखी निघाली राजाची' या गाण्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह सळसळतो. या गाण्याच्या बोलावर आणि संगीतामुळे प्रत्येक गणेश भक्त डोलू लागतो. त्यामुळे या गाण्याचे संगीतकार व गायक नितीन मोरजकर यांच्या जाण्याने लालबाग परळसह अनेक गणेश मंडळांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेक चाहत्यांनी ' पालखी निघाली राजाची ' हे गाणं कायम अजरामर राहील अशा भावना व्यक्त केल्या आहेत . हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालेलं होतं. गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक गणेश मंडळात, घराघरांमध्ये हे गीत वाजवलं जायचं. आजही या गाण्यानेच लालबागच्या राजाला मानवंदना दिली जाते.
View this post on Instagram
नितीन मोरजकर यांनी मराठी भक्ती गीत आणि गणेश गीतांमध्ये महत्त्वाचे योगदान दिलं होतं.आपल्या संगीताच्या माध्यमातून असंख्य गणेश भक्तांच्या मनात त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत विश्वातील गणेश भक्तांचा सूर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.