उन्हाळ्यात प्राणवायूच्या संवर्धनासाठी सलाईन मिशन
वसईत इवल्याश्या रोपट्याना पाण्याची व्यवस्था
वसई, ता. ११ (बातमीदार) : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. लहान रोपांना त्याची झळ बसत असून, त्यांच्या संवर्धनासाठी आता ‘नव्हे हाथ फाउंडेशन’च्या वतीने युक्ती वापरण्यात आली असून, रोपांना पाणी मिळावे म्हणून सलाईनचा वापर करण्यात आला आहे.
या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी माणसे विविध उपाय शोधत आहेत. दुसरीकडे, इतर प्राणी व वनस्पती यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो. इतर शहरांप्रमाणे वसई-विरारमध्येही काँक्रीटचे जंगल वाढत आहे. त्यासोबतच वायुप्रदूषणाचा आलेखही वाढताच आहे. या सर्वांवरील उपाय म्हणजे झाडांची लागवड होय. काही संस्था या झाडांची लागवड करण्यासह त्यांना जोपासण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. वसई पश्चिमच्या सनसिटी, चूळणा मार्ग ते आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. मात्र, येथे काही लहान रोपेही असून, त्यांच्या संवर्धनाची मोठी जबाबदारी येथील संस्थेवर आहे. यासाठी नन्हे हाथ संस्थेने पाण्याच्या एक लिटरच्या बाटल्यांना लहान लहान छिद्र पाडून ते रोपट्यांच्या भोवती ठेवले असून, ठिबक सिंचनाप्रमाणे या रोपट्यांना पाणी मिळते. यामुळे झाडांची वाढ होण्यास मदतही मिळत आहे.
--------------
कमालीची उष्णता वाढली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष आपल्याला मदत करतात. प्राणवायू देतात. अशा रोपांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून आम्ही सलाईन उपक्रम हाती घेतला आहे.
- संजय वैष्णव, संस्थापक, नन्हे हाथ फाउंडेशन
-------
वसई : लहान रोपांना प्लॅस्टिक बाटलीद्वारे पाणी दिले जात आहे.