देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती ‘मेरे देश की धरती’ या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं.
चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली होती. त्यामधील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे गाणं इतिहासात अजरामर ठरलं. या गीतामागे एक अतिशय रंजक किस्सा दडलेला आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, गीतकार गुलशन बावरा यांनी हे गाणं लिहिलं होतं. मात्र सुरुवातीला या गाण्याची पहिली ओळ वेगळी होती.
त्यांनी सुरुवातीला ‘इस देश की धरती सोना उगले’ अशी ओळ लिहिली होती. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान मात्र कल्याणजी–आनंदजी यांना ‘इस’ हा शब्द सतत खटकत होता. गाण्याच्या धुनेसोबत तो शब्द योग्य प्रकारे जुळत नव्हता आणि अपेक्षित भावना निर्माण होत नव्हती.
गाण्यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीला गीतकार गुलशन बावरा यांनाही या ओळीत काही त्रुटी वाटत नव्हती. मात्र कल्याणजी-आनंदजी यांना असं वाटत होतं की ‘इस देश’ म्हणताना आपल्या देशाशी असलेली आत्मीयता आणि जवळीक जाणवत नाही. गाण्यात ‘माझा देश’ अशी भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त व्हायला हवी होती.
अखेर कल्याणजी-आनंदजी यांच्या मनात अचानक ‘मेरे देश’ हा शब्द आला आणि त्यांनी ‘इस’ ऐवजी ‘मेरे’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. हा बदल होताच गाण्याची संपूर्ण भावना बदलली आणि ती ओळ धुनेसोबत अगदी परफेक्ट बसली. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. हे गाणं देशभरात लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.