2017 मध्ये जलीकट्टू आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आणि माजी नर्स ज्युली उर्फ मारी ज्युलियाना हिने चेन्नईमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ट्रोलिंग आणि चारित्र्यहननचा आरोप करत तिने ही तक्रार केली आहे. ‘बिग बॉस तमिळ’मध्ये भाग घेतलेल्या ज्युलीने खुलासा केला की, अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या चाहत्यांकडून आणि त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (टीव्हीके) या पक्षाच्या समर्थकांकडून झालेल्या ट्रोलिंगमुळे तिचा गर्भपात झाला. सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात तिने मार्च महिन्यात पोलिसांकडे धाव घेत आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
याविषयी ज्युली म्हणाली, “त्यांनी माझ्याविरोधात परफेक्ट कथा, स्क्रीनप्ले, दिग्दर्शन तयार केलं आहे. माझ्याविरोधात 15 लाख रुपयांचा किडनी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागे टीव्हीकेच्या एका समर्थकाचा आणि एका वकिलाचा हात आहे. मी माझं बाळ गमावलं. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि आम्ही आमचं पहिलं मूल गमावलं. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे झालेल्या तीव्र मानसिक त्रासामुळेच माझ्या बाळाचा मृत्यू झाला. सहानुभूती मिळवण्यासाठी मी याचा वापर करू शकते, पण माझा मुद्दा हा आहे की माझ्या आणि माझ्या पतीविरोधात अपमानजनक टिप्पण्या केल्या जात आहेत. फक्त एक स्त्री टीव्हीकेबद्दल बोलतेय म्हणून तुम्ही कोणताही विवेक न बाळगता तिचं नाव खराब करता. मला काहीच बोलायचं नाहीये.”
अभिनेत्रीचा व्हिडीओ-
View this post on Instagram
A post shared by Julie (@mariajuliana_official)
“लोक म्हणतात की विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या लोकांविरुद्ध बोलणाऱ्यांवर हल्ले घडवून आणण्याऐवजी त्यांनी जनतेसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करायला नको का? माझ्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं जात नाहीये, कारण मी ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते आठही जण टीव्हीकेचे समर्थक आहेत. माझ्या गर्भपाताला विजय अण्णा जबाबदार आहेत”, असं ती पत्रकार परिषदेत भावूक होऊन म्हणाली. याविषयी पुढे ती म्हणाली, “त्यांनी हे थेट केलं नसेलही. पण जर त्यांनी एक शब्द जरी बोलून समर्थकांना मागे हटायला सांगितलं असतं तर मी आज जे गमावलं आहे, ते गमावलं नसतं.”
ज्युलीच्या या आरोपांवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अंबिका यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘ज्युली, तुझ्या गर्भपाताबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. पण तुझं वक्तव्य? ते खूप अनैतिक आहे. तुझी तब्येत बिघडल्यास त्याला मुख्यमंत्री कसे कारणीभूत असू शकतात? असं बोलणंच खूप वाईट आहे. तू खूप उद्धटपणे वागलीस आणि अत्यंत वाईट भाषा वापरली आहेस. आपले मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान, मग ते 20 वर्षांचे असो किंवा 99 वर्षांचे.. आपण त्यांच्या पदाचा आदर केलाच पाहिजे.’