मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या सोन्याच्या साठ्याबाबत (Gold Reserve) मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या सर्व उलट-सुलट चर्चा आणि अफवांना पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय बँकेने एक अधिकृत पत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की, त्यांच्या सोन्याच्या भौतिक साठ्यामध्ये (Physical Gold Reserve) कोणताही बदल झालेला नसून तो पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे. ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँकेचा एकूण सोन्याचा भौतिक साठा 880.52 टन इतका असून तो पूर्वीइतकाच कायम (Unchanged) आहे.
गेल्या काही दिवसांत काही मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर असा दावा केला जात होता की, रिझर्व्ह बँकेने आपल्या सोन्याच्या साठ्यातील काही हिस्सा बाजारात विकला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे देशाच्या आर्थिक वर्तुळात विविध शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या.
या भ्रामक बातम्यांचे खंडन करताना आरबीआयने म्हटलं आहे की, "आमच्या निदर्शनास असे काही मीडिया रिपोर्ट्स आले आहेत, ज्यामध्ये केंद्रीय बँकेने सोने विकल्याचा दावा केला गेला आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, हे वृत्त पूर्णपणे चुकीचं, खोटं आणि निराधार आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या साठ्यातून कोणत्याही सोन्याची विक्री केलेली नाही."
आरबीआयने स्पष्ट केलं की, सोन्याच्या साठ्याबाबत पारदर्शकता राखण्यासाठी केंद्रीय बँकेतर्फे दर महिन्याला 'आरबीआय बुलेटिन' (RBI Bulletin) प्रसिद्ध केलं जातं. या बुलेटिनमध्ये देशाचा परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserve) आणि सोन्याच्या साठ्याची अचूक व अधिकृत माहिती दिली जाते. सध्या उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, हा सोन्याचा साठा 880.52 टनांवर मजबूत आणि स्थिर आहे.
केंद्रीय बँकेने सामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना आवाहन केलं आहे की, देशाच्या सोन्याच्या साठ्याबाबत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या आर्थिक विषयांवर केवळ आणि केवळ आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. कोणत्याही सोशल मीडियावरील अफवा किंवा अपुष्ट वृत्ताच्या आधारे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये. नागरिकांना अधिकृत माहिती हवी असल्यास ते थेट आरबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन मासिक बुलेटिन तपासू शकतात.
सोन्याच्या अनिर्बंध आयातीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क (Customs Duty) 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्के केलं आहे. आयात शुल्क वाढवण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की, सोन्याची आयात कमी व्हावी, भारतीय रुपयाला (Rupee) बळ मिळावे आणि परकीय चलन साठ्याचे रक्षण व्हावे.
ही बातमी वाचा: