Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने अद्यापपर्यंत उद्या (6 जून) होणाऱ्या जंतर मंतरवरील आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जनतेमध्ये आणि तरुणाईमध्ये असणारा रोष पाहता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आहेत. या आंदोलनासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांच्या जवानांसह सुमारे 1 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना उद्या तैनात करण्यात येणार आहे. विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर दिल्ली पोलीस कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत. परवानगी न मागता आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या सकाळपासून दिल्ली पोलिसांची ही सुरक्षा व्यवस्था लागू असेल.
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 1 जून रोजी एका व्हिडिओमध्ये म्हटले, "शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मी 6 जून रोजी सकाळी दिल्लीला येत आहे. तुम्हा सर्वांनी मला विमानतळावर येऊन भेटावे. आपण सर्व मिळून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाऊ आणि जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागू." 3जून रोजी, कॉकरोच पक्षाने दिल्लीत आपली पहिली पत्रकार परिषद घेतली, ज्यात पत्रकार सौरभ दास, मॅकिन्से अँड कंपनी या व्यवस्थापन सल्लागार संस्थेत काम केलेले आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका आणि राजकीय संशोधक व चित्रपट निर्मात्या विजेता दहिया हे पक्षाचे प्रवक्ते होते.
4 जून रोजी, अभिजीतने X वर आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले. दीपक म्हणाले, "मी स्वतः पोलीस स्टेशनला येईन आणि तिथून आपण सर्व जंतर मंतरकडे जाऊ, कारण विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्याने जनतेला आणि सुरक्षा दलांना गैरसोय होईल." एक्स (X) वर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये दीपक म्हणाले, "नीट (NEET) परीक्षा रद्द झाल्यामुळे पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सीबीएसई (CBSE), सीयूईटी (CUET) आणि एसएससी (SSC) सारख्या परीक्षांमधील गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थी प्रभावित झाले. देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलने उसळली, तरीही प्रधान यांनी राजीनामा दिलेला नाही. या देशात सरकारने आपली जबाबदारी गमावली आहे. हे असे किती काळ चालणार?"
सीजेपीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी असेही सांगितले की, प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या वेबसाइटवरील याचिकेला आधीच आठ लाखांहून अधिक लोकांचा पाठिंबा मिळाला आहे, यावरून विद्यार्थ्यांचा संताप असह्य झाला आहे हे सिद्ध होते.
इतर महत्वाच्या बातम्या