राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
Tv9 Marathi June 06, 2026 09:45 PM

सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत  विजय झाल्यामुळे  त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या वाट्याची राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. दरम्यान या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, पिकाच्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी आलेल्या असताना त्या बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? 

प्रत्येक पक्षाला सर्वांचे विचार घेऊनच एखादा उमेदवार ठरवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर आमची चर्चा सुरू आहे. उमेदवारांची चर्चा होत असताना अनेक नावे समोर येत असतात.  उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला नाव कळेल. आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो, उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे, त्या सगळ्यांचाच प्रत्येक पक्ष विचार करत असतो, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

पिकांच्या नुकसानावर प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वादळी वारा आणि पाऊस यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अचानक मोठं वारं सुटलं, त्यामुळे बारामतीत मोठी झाडे पडली अशी माहिती मला मिळाली आहे. शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत, पुढच्या गोष्टी आपण करत आहोत. कर्जमाफी झालेली आहे. अगोदर या नुकसानीची किती तीव्रता आहे? हे पहावं लागेल. यावरती सकारात्मक विचार करण्यात येईल, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची तसेच त्यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला आहे.  भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करून आज रात्री उशिरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कळवू असं अश्वासन यावर फडणवीसांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.