टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. टीम इंडियाच्या नावावर पहिला दिवस राहिला. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 368 धावा केल्या. टीम इंडियासाठी केएल राहुल आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. दोघांनीही शतक झळकावलं. साई सुदर्शन यालाही शतकाची संधी होती. मात्र साईची थोडक्यात संधी हुकली. साई आणि ऋषभ पंत या दोघांनी अर्धशतक झळकावलं. तर खेळ संपल्यानंतर शुबमन आणि ऋषभ नाबाद परतले.
कर्णधार शुबमनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारताला ठीकठाक सुरुवात मिळवून दिली. मात्र 12 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर यशस्वी जैस्वाल 24 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन या दोघांनी शतकी भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 184 बॉलमध्ये 139 रन्सची पार्टनरशीप केली. साईच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. साईने 104 बॉलमध्ये 81 रन्स केल्या. साईने या दरम्यान 13 चौकार लगावले.
त्यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 106 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली. या दरम्यान केएलने शतक केलं. मात्र केएल शतक करताच दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. केएलने 143 चेंडूत 11 फोर आणि 1 सिक्ससह 100 धावा केल्या.
केएल आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 247 अशी झाली. त्यानंतर शुबमन आणि ऋषभ पंत या दोघांनी 350 पार पोहचवलं आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. दोघांनी 148 बॉलमध्ये नॉट आऊट 121 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमन गिल 143 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्ससह 103 रन्स करुन नॉट आऊट परतला. तर ऋषभ पंत याने 70 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या.
पहिला दिवस भारताचा
तर अफगाणिस्तानकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी फक्त दोघांनाच यश आलं. मोहम्मद सलीम सफी याने दोघांना आऊट केलं. तर झियाउर रहमान शरीफी याने 1 विकेट मिळवली.