तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुखेन्दू शेखर रे यांनी तडकाफडकी राजीनामा देत पक्ष सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेस वाढत्या अंतर्गत मतभेदांशी झुंजत आहे, ज्यामुळे पक्षात फूट पडू शकते. अशा वेळी ही घडामोड समोर आली आहे.
तृणमूल काँग्रेसवर नाराजी
विधानसभा निवडणूकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घटना घडत आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षात एका बाजूला पक्षात मोठी फूट पडलेली असताना दुसऱ्या बाजूला काही ज्येष्ठ सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमुल काँग्रेसचे वरिष्ठ नेते असणारे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खा. आनंद बॅनर्जी यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. पक्षाचे नेते संन्यासी मन्ना यांची तर लोकांनी गाढवावरुन धिंड काढल्याचे वृत्त चर्चेत होते.
आपल्या राजीनामा पत्रात राय म्हणाले की, पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने निर्णायक कौल दिला असून, राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत केला आहे.
निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत रे यांनी लिहिले, “पश्चिम बंगाल विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या अराजक राजवटीला संपुष्टात आणण्यासाठी जनतेने राज्याच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या बाजूने प्रचंड कौल दिला आहे.” सुखेंदू शेखर यांनी आपल्या पत्रात पुढे असा आरोप केला की, टीएमसी सरकार हे “व्यापक अनियंत्रित भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कायदा व सुव्यवस्था, रोजगार इत्यादी क्षेत्रांतील घोर अपयश” यांनी ग्रासलेले होते.
जनतेचा कौल स्वीकारतो.
नवनिर्वाचित जनतेच्या सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार पश्चिम बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्रचनासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.” दोन्ही पदांवरून पायउतार होत असल्याची घोषणा करताना, रे म्हणाले की ते जनतेचा कौल स्वीकारून पदत्याग करत आहेत.
आपल्या राजीनाम्यात “जनतेच्या या ऐतिहासिक निकालाचा आदरपूर्वक स्वीकार करून, मी आज राज्यसभेच्या (राज्य परिषदेच्या) सदस्यत्वाचा आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे,” असे त्यांनी लिहिले. पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर एका महिन्याने आणि ५८ बंडखोर आमदारांनी विधिमंडळ पक्षावर नियंत्रण मिळवल्यानंतर काही दिवसांतच, तृणमूल काँग्रेस आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एकाचा सामना करत आहे.