पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो, भारतामध्ये दर वर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मरतात. अर्थात यातील असे अनेक लोक असतात की ज्यांना वेळेत उपचार मिळू न शकल्यानं त्यांचा मृत्यू होतो. सर्पदंशानंतर तुम्हाला जर वेळेत उपचार मिळाला तर तुमचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्पदंशानंतर वेळ वाया न घालवता तातडीने डॉक्टरकडे जाणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. जर तुम्हाला वेळेत अँण्टी व्हेनम मिळालं तर तुमचा जीव वाचू शकतो. प्रत्येक साप हा विषारीच असतो, असा फार मोठा गैरसमज भारतामध्ये सापांबद्दल असतो. त्यामुळे अनेकजण काय करतात की दिसला साप की त्याला लगेच मारतात. परंतु सगळेच साप हे काही विषारी नसतात. साप दिसला तर त्यांना मारू नका, किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या.
दरम्यान राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. पावसाळ्यात अनेकांना बाग कामाची आवड असते. परंतु अशी देखील काही झाडं असतात जी सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे घराशेजारी जर बाग असेल तर शक्यतो अशी झाडं लावू नयेत. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. अशावेळी ते नेहमी कोरड्या जागेचा शोध घेत असतात. अशी काही झाडं असतात ज्या झाडांच्या पानाचा आकार मोठा असतो, त्यामुळे पावसाळ्यात सापांना या झाडाच्या पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते आणि पावसापासून त्यांचं संरक्षण होतं. त्यामुळे शक्यतो अशी झाडं घरापासून थोडी दूर लावली पाहिजेत.
केळीचं झाड हे देखील असंच एक झाड आहे, जे सापांना आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आकर्षित करतं. केळीच्या झाडाचे पानं ही मोठी असतात, त्यामुळे या पानांमध्ये लपण्यासाठी सापांना सहज जागा मिळते, तसेच पावसापासून देखील त्यांचं संरक्षण होतं. त्यामुळे पावसाळ्यात केळीच्या झाडाखाली साप असल्याची शक्यता अधिक वाढते. तुम्ही जेव्हा हे झाडं दारा जवळ किंवा खिडकी जवळ लावतात, तेव्हा हे साप सहज तुमच्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे हे झाड घरापासून थोडं दूर लावायला हवं. यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.