बेस्टचा संप मिटणार ? मागण्या मान्य झाल्या का, काय म्हणाले परिवहन मंत्री ?
Tv9 Marathi June 19, 2026 10:45 PM

बेस्टचा संपाने आज शुक्रवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, रात्रीपासून बेस्टच्या बसेसची चाके जाम करण्यात आल्याने मुंबईकरांना ओला, उबर आणि काळी-पिवळी टॅक्सीवर अवलंबून राहावे लागले. त्याचा गैरफायदा काही टॅक्सीवाल्यांनी घेत अवाच्यासवा भाडे लावल्याने मुंबईकरांना मन:स्ताप भोगावा लागला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायंकाळी बेस्ट कामगार कृती समितीच्या सदस्यांना बोलावून बैठक घेतली. त्यावेळी कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला जाईल असे आश्वासन सरनाईक यांनी करत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सायंकाळी बेस्ट कामगार कृती समितीच्या सदस्यांना आमंत्रित करीत बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की नगरविकास खात्याकडे पालिकेची धुरा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेतली आहे. ते यावेळी पुढे म्हणाले की आज मुंबईत (शुक्रवारी ) बहुतांश बस बंद होत्या.  बेस्ट कामगाराच्या मागण्या अवाजवी नाहीत. बेस्टचे विलिनीकरण मुंबई महानगर पालिकेमध्ये करावे हा ठराव झाला होता. त्या अनुषंगाने त्यांची मागणी बेस्टचे पालिकेत विलीनीकरण करावे अशी आहे.

या बैठकीला नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता हजर होते. त्यांना बेस्टचे पालिकेतील विलीनीकरण करण्याचा ठराव झाला होता. त्याबाबतची बैठक घ्यावी. महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांना देखील सांगितलं पुढच्या एका आठवड्यात सर्व प्रश्न सोडवावेत. असीम यांनी हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे अजून आला आहे की नाही? हे पाहायचे आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी महापौरांशी देखील याबाबत बोलावे. एक बैठक घेऊन यावर कायमचा तोडगा कसा काढावा यासाठी सूचना दिल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

10 मिनिटात संप संपेल

बहुतांश कामगार संघटनांनी संप मागे घेणार असे सांगितले आहे. आपण याबाबत सकारात्मक आहोत आज किंवा उद्याचा विचार न करता पुढच्या 10 मिनिटात संप संपेल असे वाटते. विलिनीकरण हा त्यांच्या विषय होता त्याबाबत शासनाला बैठक घेऊन लवकर निर्णय घ्यायला सांगितले आहे. पुढच्या काही मिनिटात कामगार संप मागे घेण्याबाबत घोषणा करतील असेही सरनाईक यावेळी म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.