शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, तर दुसरीकडे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कार्यक्रम पार पडला.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा जोरात आहे. हे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, त्यांच्या प्रवेशाबाबत आजच्या कार्यक्रमात काही मोठी घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घडामोडींवर अप्रत्यक्षपणे सूचक विधान केले. त्यांनी शिवसेनेच्या 60 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत सर्व कार्यकर्ते, नेते, आमदार आणि खासदार हे आपले ऐश्वर्य असल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले, “समोर बसलेले माझे शिवसैनिक हे माझी संपत्ती आहेत. बऱ्याच जणांच्या नजरा आमच्याकडे लागल्या आहेत. मी काय बोलणार, कोण येणार, काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण आज हा वाघ तुमच्यासमोर उभा आहे.”
यावेळी त्यांनी विरोधकांवरही तीव्र शब्दांत टीका केली. “काही लोक रोज भुंकतात, पण वाघ एकटाच येतो आणि शिकार करतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. पुढे काय होतंय ते बघा,” असे सूचक विधान करत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे.