अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..
GH News June 21, 2026 01:10 AM

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच टीम इंडियाची पायाभरणी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. त्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिलं जात होतं. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने मात दिली. मालिका विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत व्यक्त केलं. या मालिकेत तुम्ही किती गोष्टी साध्य केल्या आहेत? या प्रश्नावर शुबमन गिल म्हणाला की, ‘नक्कीच बऱ्याच. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत. आम्ही मधल्या षटकांमध्ये तीव्रता टिकवून ठेवण्याबद्दल बोललो आणि आम्ही ज्या काही गोष्टींवर चर्चा केली त्या म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजी युनिट म्हणून आपण मधल्या षटकांमध्ये संधी कशा निर्माण करत राहू शकतो, मधल्या षटकांमध्ये अतिरिक्त धावांसाठी जोर कसा लावू शकतो. आणि मला वाटतं की त्यापैकी बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत.’

तुमच्या आगामी कार्यक्रमांपैकी तुम्ही कशाची आतुरतेने वाट पाहत आहात? या प्रश्नावर उत्तर देताना वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीबात शुबमन गिलने सांगितलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘इंग्लंडला जाताना तिथली परिस्थिती दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीसारखीच असेल, अगदी तशीच नाही, पण तरीही जवळपास तशीच असेल. त्यामुळे तिथे आम्ही ज्या प्रकारचा संघ खेळवण्याचा विचार करत आहोत, त्यासाठी आशा आहे की आमचे सर्व खेळाडू तंदुरुस्त आणि तयार असतील, ही आमच्यासाठी आणखी एक उत्तम मालिका ठरेल.’ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा दौरा महत्त्वाचा असल्याचं शुबमन गिलने अधोरेखित केलं.

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी आता असलेला संघच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीसाठी एखाद दुसरी जागा केली जाण्याची शक्यता आहे. भारत इंग्लंड वनडे मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला वनडे सामना 14 जुलै, दुसरा वनडे सामना 16 जुलै आणि तिसरा वनडे सामना 19 जुलैला होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.