शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत असून त्यांनी अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. “मी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच माझा निर्णय जाहीर करणार,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या घडामोडीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. “जे परत येऊ इच्छितात त्यांचे स्वागत आहे,” अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेतली जात आहे.
दरम्यान, या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. काही खासदारांकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपलब्ध नसल्याचा दावा केला जात असल्याचेही सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
“खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात फिरायला हवे. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांचा विषय नंतर पाहू. पण त्यांच्यावर केले जाणारे आरोप चुकीचे आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे फिरले नसते तर हे खासदार निवडूनच आले नसते. लोकांनी ठाकरे कुटुंबाकडे पाहून मतदान केले आहे. हे मतदान व्यक्तींना नव्हे तर ठाकरे परिवाराला झाले आहे.”
दरम्यान, “ते काही एवढे महान नाहीत,” असा थेट हल्लाबोलही राऊत यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापले असून शिवसेना बंडखोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.