पारगाव : अनेक दिवसांच्या तीव्र उष्णतेनंतर आणि मान्सूनच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आज रविवारी सायंकाळी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. आजच्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी कांद्याच्या बराकीत पाणी शिरल्याने कांदे भिजून मोठे नुकसान झाले.
जुन महिन्याचा तिसरा आठवडा सुरु असुनही अजून पाऊस न झाल्यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावे म्हणून ओळख असलेल्या लोणी- धामणी परिसरातील आठ गावातील शेतकरी चिंतेत सापडला होता. आज रविवारी सायंकाळी चार नंतर आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. लोणी, वडगावपीर, वाळुंजनगर, रानमळा , खडकवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव परिसरात जोरदार पाऊस झाला रस्त्यावर शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली , पावसाचे पाणी बराकीत शिरून कांदे भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतात पाणी साचल्याने शेतातील तरकारी पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पोंदेवाडी येथील अनिल वाळुंज व वाळुंजनगर येथील जयेश वाळुंज यांनी सांगितले. वाळुंजनगर येथील भिमाजी शांताराम वाळुंज परिवारांमधील विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आज रविवारी विवाह प्रित्यर्थ सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे घरासमोरील सर्व मंडप तुटला तर मंडपाचे कापड वाऱ्याने फाटून उडून गेले. याच परिसरात झाड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप झाली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.