मोठी बातमी! आष्टीकर, ओमराजेंच्या अतिघाईने मोठा घात, सहाही जणांची खासदारकी धोक्यात, ऑपरेशन टायगरला सुरुंग? आता चेंडू…
Tv9 Marathi June 22, 2026 01:45 AM

शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण  झाली होती. संपूर्ण राज्याचं लक्ष ओमराजे निंबांळकर यांच्या भूमिकेकडे लागलं होतं. कारण ओमराजे काय निर्णय घेणार यावरच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवंलंबून होतं, अखेर आज ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे आणखी एक बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.

मी कोणावरही नाराज नाही, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्यावर नाराज नाही. परंतु सत्तेशिवाय कामे होत नाहीत, मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मोठ्या आशेनं, विश्वासाने निवडून दिले आहे, मला माझ्या मतदारसंघात कामे करायची आहेत, त्यामुळे सत्तेत जाण क्रमप्राप्त आहे, असं नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं होतं. मात्र या दोन बंडखोर खासदारांनी आपली भूमिका जाहीर केल्यामुळे आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्या अति घाईने इतर सहा जणांची खासदारकी देखील धोक्यात आली आहे.

खासदारकी धोक्यात कशी? 

आष्टीकर आणि ओमराजे यांनी स्वतंत्रपणे पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे गट या दोघांवरही स्वतंत्रपणे बडतर्फीच्या कारवाईची शिफारस करू शकतो. एखाद्या पक्षातून दोन तृतियांश खासदार फुटले तरच त्यांची खासदारकी वाचू शकते. म्हणजे ठाकरेंकडे 9 खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदार एकाचवेळी बाहेर पडणं आणि त्यांनी आम्ही पक्ष सोडल्याचं एकत्रितपणे जाहीर करणं आवश्यक आहे. पण तसं झालं नाही. सहा जणांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली नाही. उलट आष्टीकरांनी दुपारी आणि ओमराजेंनी रात्री पक्ष सोडल्याचं जाहीर केलं.

नऊ पैकी दोन खासदारांनी पक्ष सोडतो असं जाहीर केलं. याचाच अर्थ सहा खासदारांनी ही घोषणा केली नाही. म्हणजेच दोन तृतियांश खासदारांनी पक्ष सोडतोय असं जाहीर केलं नाही. त्यामुळे या दोन्ही खासदारांवर स्वतंत्रपणे कारवाई करण्यास ठाकरे गटाच्या हाती कोलित मिळाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

या सहाही खासदारांनी आपण स्वतंत्र गट तयार केल्याचं म्हटलं नाही. तसं पत्रही त्यांनी दाखवलं नाही. लोकसभा अध्यक्षांकडूनही त्याबाबत काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच इतर चार खासदारांनीही आपण पक्ष सोडल्याचं म्हटलं नाही. याचाच अर्थ दोनच खासदार अधिकृतपणे बाहेर पडले आहेत, असं तरी सध्या दिसत आहे. त्यामुळे या दोन खासदारांवर कारवाई होऊ शकते, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.