Chanakya Niti : या तीन प्रसंगी कधीही रागवू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
Tv9 Marathi June 22, 2026 01:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शकाचं काम करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे राग. त्यामुळे माणसाला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुमचं रागावर नियंत्रण असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक मित्र जोडू शकतात. परंतु तुम्हाला जर लगेच राग येत असेल तर मात्र तुमचे अनेक शत्रू तयार होतील. त्यामुळे माणसाने नेहमी रागावर नियंत्रण ठेवावं. माणसाच्या डोक्यावर नेहमी बर्फ आणि जीभेवर साखर असावी, जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत असाल तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोक तुमचा आदरच करतील. मात्र तुम्ही जर फटकळ असाल, रागीट असाल तर तुमचा कोणीही मित्र होणार नाही, आयुष्यात एकटे पडाल, चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात असे तीन प्रसंग असतात, जिथे माणसाने शांत बसावं, राग करू नये. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मुलांशी बोलताना – चाणक्य म्हणतात अनेक पालकांना अशी सवय असते की मुलाची थोडी जरी चूक झाली तर ते त्याला लेगच रागवतात. मात्र पालकांच्या या सवयीचा मोठा परिणाम हा तुमच्या मुलावर होतो. मुलं नेहमी काही छोटे-छोटे प्रयोग करत असतात, आणि या प्रयोगामधून ते शिकत असतात. परंतु जेव्हा त्यांची चूक होते, तेव्हा जर तुम्ही त्यांच्यावर ओरडले तर त्याचा त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो, आणि ते प्रयत्न करणं सोडून देतात. मुलांचा विकास होत नाही, त्यामुळे मुलांवर न रागवता, त्यांना त्यांची चूक प्रेमाने समजावून सांगावी.

वडीलधाऱ्या व्यक्तींशी बोलताना – चाणक्य म्हणतात आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती असतात, त्यांच्या विचारामध्ये आणि आपल्या विचारामध्ये एका पिढीचं अंतर असतं, त्यामुळे मतभेदाची शक्यता असते, परंतु जेव्हा तुमचे असे मतभेद होतील, तेव्हा रागवू नका, तर ते काय म्हणतात हे नीट समजून घ्या. कारण त्यांचा अनुभव हा तुमच्यापेक्षा मोठा असतो, त्यातच तुमचं हीत आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कोणताही निर्णय घेताना – चाणक्य म्हणतात कोणताही निर्णय कधीही रागाच्या भरता घेऊ नका, जेव्हा तु्म्ही एखादा निर्णय रागाच्या भरात घेता, तेव्हा तो निर्णय चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्णय घेताना मनात राग ठेवू नका तर शांत डोक्याने निर्णय घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.