विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी या पराभवाची दखल घेतली आहे. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा नाशिक मध्ये पराभव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती मागवली आहे. या पराभवावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुती धर्माचे पालन का झालं नाही ? याबद्दल एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमधले पदाधिकारी आणि उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी माहिती मागवली असं सूत्रांनी सांगितलं. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी विधान परिषदेचीही निवडणूक झाली. त्यात 6 जागा आधीच बिनविरोध आल्या होत्या. आज उर्वरित 11 जागांसाठी मतमोजणी झाली. त्यात नाशिकच्या निकालाबद्दल सर्वांनाच उत्सुक्ता होती. कारण नाशिकमध्ये भाजपशी संबंधित असलेल्या गीते बंधुंनी बंडखोरी केली होती. गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. हे गीते बंधु भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यामुळे नाशिकच्या निकालाबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शेवटपर्यंत धाकधुक होती. ती चुकीची नव्हती हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं.
भाजपने किती युती धर्म पाळला ते स्पष्ट होतं
गोकुळ गीते या अपक्ष उमेदवाराच्या विजयातून भाजपने किती युती धर्म पाळला ते स्पष्ट होतं. कारण नाशिकमध्ये भाजपचं बळ जास्त आहे. त्यामुळे त्यांचे सदस्य कोणाच्या बाजूने मतदान करणार त्यावर विजयाच पारडं झुकणार होते. भाजप सदस्यांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोकुळ गीते यांना मतदान केल्याचे स्पष्ट होतय. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी त्यांच्या बऱ्याच नाकदुऱ्या काढल्या. पण त्यात यश आलं नाही हेच आजच्या निकालावरुन दिसलं. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करावा ही मागणी त्यांनी मान्य केली नाही. त्यांनी फक्त प्रचार थांबवला. पण पडद्याआडून प्रचार सुरुच होता, हे निकालावरुन स्पष्ट झालं आहे.