ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर ऑपरेशन टायगर संपलं अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल, असं सूचक विधान केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंच्या टार्गेटवर आता आमदार आहेत की नगरसेवक? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झालेली असतानाच उद्धव ठाकरे मात्र अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या खासदारांनी बंड केलं, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मतदारांची माफी मागायला सुरुवात केली आहे. तसेच आज तर त्यांनी थेट आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या फुटीनंतर आज आमदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 2.30 वाजता शिवालय येथे ही बैठक होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत सहा खासदार फुटल्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच आमदारांनी एकजूट राहावं म्हणून खास प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच आमदार फुटणार तर नाही ना? याचा कानोसाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात? काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रणनीती ठरणार
याशिवाय आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाची रणनीतीही आजच्या बैठकीत ठरणार आहे. कर्जमाफी, पाऊस, नीट परीक्षा आणि विषबाधा आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच आमदारांचे प्रश्नही या निमित्ताने समजून घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उद्या डिनर डिप्लोमसी
दरम्यान, उद्या महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी होणार आहे. महाविकास आघाडीने उद्या संध्याकाळी एमसीएमध्ये बैठकीचं आयोजन केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. खासदारांची फूट, विधान परिषद निवडणूक निकाल आणि विधानसभेचं पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ही डिनर डिप्लोमसी होत आहे. त्यामुळे या डिनर डिप्लोमसीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.