नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. आता या खासदार फुटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फुटलेल्या सहा खासदारांना भाजपचं कमळ हाती घ्यायचं होतं. सहावा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार नव्हता. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आली अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलं. “मला एकच वाटतं या देशात लोकशाही संपुष्टात आलीय का?. घरं,पक्ष फोडतात. निवडून आलेत दोन-अडीज वर्ष झालेली. 2029 मध्ये निवडणुका होत्या. इतकी घाई कशाला करायची. एखाद्या चांगल्या विधेयकासाठी, जीएसटीच्यावेळी बिल पास करण्यासाठी काँग्रेसने आम्ही एकमताने भाजपला मदत केली. त्यासाठी तोडफोड करण्याची गरज काय आहे?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
“विरोधी पक्ष राहिला नाही, सगळे सत्तेत आले, तर माय-बाप जनतेसाठी बोलणार कोण?” असा रास्त प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला. महाविकास आघाडीच्या बैठकीला 13 आमदार अनुपस्थित होते का? या प्रश्नावर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आधीच आगाऊ कळवलं होतं. बाकी माहिती तुम्हाला मुंबईत बंटी दादा, शिंदे साहेब देतील” शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एकूण 10 आमदार आहेत.
सरकारकडून सातत्याने NCERT चा गैरवापर
आता आणीबाणीचा धडा शालेय पुस्तकातून शिकवला जाणार यावरही सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडलं. “सरकार सातत्याने NCERT चा गैरवापर करतय असं शिक्षण तज्ञ म्हणत आहेत. शिक्षण तज्ञांचे तुम्ही लेख वाचले, भाषणं ऐकली की त्यातून लक्षात येतं. पुढच्या पिढीवर एक विचारधारा लादली जात आहे. हे देशाच्या ऐक्यासाठी. नव्या पिढीच्या विचारधारेसाठी घातक ठरु शकतं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सहकार, संस्थांमध्ये राजकारण आणू नये
उद्धव ठाकरे म्हणाले आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र होतो, पण आता मविआ म्हणून खरच एकत्र आहोत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी दिल्लीत जास्त पाहते. इंडिया आघाडी मविआ तिथे मजबूत आहे. खर्गेजींच्या ऑफिसमध्ये रोज सकाळी 10 वाजता भेटतो, दिवसभर कोण काय करणार, भाषण कोण करणार यावर चर्चा होते” असं सुप्रिया सुळे बोलल्या. सहकाराच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. “बँकेत इलेक्शन हे सहकाराचं इलेक्शन आहे. मुंबईची बँक बघा, सर्व पक्षाचे लोक आहेत. सहकार, संस्थांमध्ये राजकारण आणू नये. ही आमची नेहमीच भावना राहिली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवार गटाचे खासदार फुटण्यावर प्रतिक्रिया
शरद पवार गटाचे खासदार फुटणार यावर सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या. “बाबा आत्रम यांच्यावर सुळे यांनी टीका केली. आमचे कोण खासदार आहेत, त्यांची नाव द्या. 5 नाव कोण आहेत,ते त्यांनी सांगावं. नसेल तर आम्हाला ही बोलवा, आम्ही आठ जण येवू. मला का बोलवत नाहीत मग” असा सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.