Siya Goyal Case Pune : ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेल्या, पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन विशाल अग्रवालच्या हत्येप्रकरणी पोलिसांना एक महत्त्वपूर्ण दुवा सापडला आहे. या तपासामुळे आता या भीषण गुन्ह्यामागचे मुख्य कारण समोर येत असल्याचं दिसून येतंय. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल ही लग्नासाठी मानसिकदृष्ट्या अजिबात तयार नव्हती. ती केवळ कुटुंबाच्या प्रचंड दबावाखाली हे नातं पुढे नेत होती आणि याच परिस्थितीमुळे तिने केतनला कायमचे संपवण्याचा भयानक निर्णय घेतला.
न्यायालयाने सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन मुख्य आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतन अग्रवाल हा पुण्यातील गहुंजे परिसरातील रहिवासी होता आणि तो त्याच्या कुटुंबाच्या ‘सक्सेस ग्रुप’ या रिअल इस्टेट व्यवसायात डायरेक्टर व चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) म्हणून काम करत होता. केतन आणि सिया यांचे लग्न या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात होणार होते. या भव्य सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राजस्थानमधील एक पॅलेसह आधीच बूक करण्यात आला होता, इतकेच नव्हे तर पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या सर्व झगमगाटामागे एक खोलवर रचलेलं कारस्थान शिजत होतं.
दिवाळी पार्टीत भेट आणि अफेअर
तपासातून असे समोर आले आहे की, सिया गोयल हिची गेल्या वर्षी एका दिवाळी पार्टीत चेतन चौधरी याच्याशी भेट झाली होती. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. सिया लग्नासाठी वारंवार टाळाटाळ करत होती. आपण आपल्या कुटुंबाचा दबाव सहन करू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर तिने केतनचा काटा काढण्यासाठी, चेतनसोबत कट रचला. डिजिटल पुरावे आणि दोघांमधील व्हॉट्सॲप चॅट्सवरून या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.
14 जूनला वाचला होता केतन
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एक धक्कादायक खुलासा केला आहे. 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या अवघ्या चार दिवस आधी—म्हणजेच 14 जून रोजी, सिया केतनला त्याच लोहागड किल्ल्यावर घेऊन गेली होती. तिथे तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळच्या झाडांना घट्ट पकडून केतनने आपला जीव वाचवला. जेव्हा केतनने तिला याबद्दल जाब विचारला, तेव्हा तिने “साप, साप” असं सांगत खोटा आरडाओरडा केला आणि भीतीपोटी आपण तुला चुकून ढकललं असा दावा केतनसमोर केला होता. सियाने 31 मे रोजीही परिसराची पाहणी (रेकी) करण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
बाली ट्रिपचा सस्पेन्स , टॉयलेटमध्ये फ्लश केला पासपोर्ट
केतनच्या वडिलांनी सियावर प्री-वेडिंग शूट मुद्दाम रद्द करायला लावल्याचा आरोपही केला. त्यांनी सांगितले की, केतन, सिया आणि त्यांची भावंडं मुंबई विमानतळाच्या दिशेने निघाली होती, तिथून ते बालीला विमानाने जाणार होते. मात्र वाटेत, लोणावळ्यातील एका फूड मॉलमध्ये, आपला फोन आणण्याच्या बहाण्याने सिया गाडीकडे परत गेली. विमानतळावर पोहोचल्यावर असं लक्षात आले की, त्या पाऊचमधून केवळ केतनचाच पासपोर्ट गायब झाला होता.ही सहल रद्द व्हावी आणि त्याऐवजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेता यावे, यासाठी सियाने केतनचा पासपोर्ट टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकण्याचा कट रचला होता, असा आरोप केतनच्या वडिलांनी केला होता.
400 फूट खोल दरीत ढकललं, चेहऱ्यावर काहीच दु:ख नाही
19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता; याच निमित्ताचा फायदा घेऊन ती एक दिवस आधी 18 जूनला केतनला पुन्हा एकदा लोहागड किल्ल्यावर घेऊन गेली. ठरल्याप्रमाणे, तिचा प्रियकर चेतन चौधरी तिथे आधीच हजर होता. त्या दोघांनी केतनला एका निर्जन आणि अत्यंत धोकादायक ठिकाणी नेले आणि त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले.
फोटो काढत असताना जोरदार वाऱ्यामुळे केतनचा पाय घसरला होता असा दावा सुरूवातील सियाने पोलिसांसमोर केला होता. “जेव्हा पोलिसांनी माझ्या मुलाचा मृतदेह आणला, तेव्हा सियाच्या चेहऱ्यावर कोणतीही अस्वस्थता किंवा दुःखाची भावना नव्हती. तिचं वागणं अत्यंत संशयास्पद होते” असं केतनचेवडील म्हणाले. सध्या, पुणे ग्रामीण पोलीस ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.