पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालचा (Ketan Agarwal Murder ) 18 जून रोजी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. त्याच्या हत्याकांडप्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. केतनच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. ते 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. मात्र आता या प्रकरणात सिया गोयल हिला मोठा धक्का बसला आहे, कारण या हाय-प्रोफाईल केसमध्ये पोलिसांची नजर सिया हिचा भाऊ साहिल गोयलवर पडली आहे. पोलिसांनी साहिलला चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याची बहीण सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेमसंबंधांची त्याला आधीच कल्पना होती. त्याने ही माहिती आपल्या कुटुंबाला किंवा इतर कोणालाही का दिली नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आता करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, साहिलच्या जबाबामुळे या हत्याकांडाच्या संपूर्ण घटनाक्रमातील अनेक महत्त्वाचे दुवे जोडले जाऊ शकतात. सध्या त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, त्याचा जबाब केस डायरीमध्ये नोंदवला जात आहे. तसेच, सियाची मानसिक स्थिती, तिचे नातेसंबंध आणि तिचे लग्न यांबाबत कुटुंबात झालेली चर्चा, त्याचे चर्चेचे स्वरूप जाणून घेण्याचाही तपास पथकाकडून प्रयत्न केला जात आहे.
भावाच्या जबाबातून उकलू शकतं मोठं गूढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांच्यातील मैत्री किंवा नातं, त्यांचा संपर्क याबद्दल साहिलला कल्पना होती, असे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तपास पूर्ण होण्यापूर्वीच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्या दोघांमधील संपर्काबद्दल कुटुंबातील इतर कोणालाही माहिती होती का, याचाही तपास सुरू आहे. आणि जर कोणाला याबद्दल आधीपासून माहीत होतं, तर कोणीच ही गोष्ट गांभीर्याने का घेतली नाही, हाही तपासाचा एक पैलू आहे.
चौकशीत उघड झाला हत्येचा पूर्ण प्लान
दरम्यान, पोलिसांच्या तपासातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान हत्येच्या संपूर्ण कटाचा सविस्तर तपशील सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वीच सिया आणि चेतन यांनी कट निश्चित केला होता; त्यानुसार, सियाने एका विशिष्ट ठिकाणी बसून ठरल्याप्रमाणे चेतनला सिग्नल द्यायचं असं ठरलं होतं. तो संकेत मिळताच चेतन हा केतन अग्रवालच्या मागे जाईल आणि त्याला खोल दरीत धक्का देईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना अगदी योजनेप्रमाणेच घडली. शेवटच्या क्षणापर्यंत केतनला कोणतीही शंका आली नाही आणि काय घडत आहे हे समजण्याआधीच त्याला दरीत ढकलण्यात आलं.
आधी दोघांनी केला बचावाचा प्रयत्न
अटक झाल्यानंतर सिया आणि चेतन हे दोन्ही आरोपी एकमेकांवर दोषारोप करत होते. चेतन चौधरीने सुरुवातीला असा दावा केला की, तो किल्ल्यावर उपस्थित असला तरीही ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे तो गेला नव्हता. एवढंच नव्हे तर तिथे नेमकं काय घडलं याचीही आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असंही चेतनने सांगितलं. मात्र पोलिसांच्या त्याच्यावर विश्वास बसला नाही. तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरून गोळा केलेली माहिती यांचे विश्लेषण तसेच सखोल चौकशीनंतर, या दोघांनीही आपल्या जबाबात बदल केला. त्यानंतर, सिया आणि चेतन यांनी कथितरीत्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण कट पोलिसांसमोर उघड केला.