गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात तसेच मपुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाच्या सरींनी अख्ख्या राज्याला झोडपून काढल असून पावसाचा जोर काही कमी होत दिसत नाही. अनेक दिवसांपासून नागरिकांना पावसची प्रतीक्षा होती. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागिरकांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे दिलासा तर मिळाला आहे. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणं, कुठे झाड कोसळणं , कुठे दरड पडणं अशाही घटना सुरूच आहे. सोमवारी सकाळीही जोरदार पावसाने हजेरी लावली असून असून मुंबई-पुणे महार्गावार, तसेच रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने दोन्ही वाहतूक ठप्प झाली. मुंबई पुणे येथील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या. हे कमी की काय म्हणून आता कर्जत–खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सतत होणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या झालेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे कर्जत–खोपोली दरम्यानच्या रेल्वेमार्गावरील खडीचा थर वाहून गेला आहे. मात्र सुदैवाने ही बाब सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळेत लक्षात आली. त्यानंतर ती गोष्ट त्यांनी लागलीच निदर्शनास आणून दिली, म्हणूनच आता खबरदारीचा उपाय म्हणून कर्जत–खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून मार्ग पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आली असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग सुरक्षित झाल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
मुसळधार पावसाचा रेल्वेला मोठा फटका, अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा देखील विलंबाने
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई–पुणे संपर्क खंडित झाला आहे तर अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा देखील 15 मिनिटे उशिरा सुरू आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सततच्या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेलाही बसला आहे. ; अप आणि डाउन मार्गावरील सर्वच लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून चौकशी कक्षांवर वर्दळ वाढली आहे. रेल्वे सेवांतील विलंब आणि बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम असून नाराजी पसरली आहे.
पश्चिम रेल्वेची सेवा उशीराने
दरम्यान वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान झालेल्या पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या अंदाजे १५–२० मिनिटे उशिराने धावत आहे. यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी कृपया आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. तसेच प्रवासासाठी अतिरिक्त वेळ लागेल हे गृहीत धरून तसे बाहेर पडावे. असेही रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
मुंबई -पुणे एसटी बस देखील बंद
मुंबई -पुणे एसटी बस देखील बंद राहणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत एसटी बस देखील बंद राहणार आहे. रेल्वे पाठोपाठ पुणे मुंबई एसटी सेवा देखील बंद रण्यात आली आहे. आधीच रेल्वे सेवा ठप्प त्याचतच आता मुंबई पुणे एसटीदेखील बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.