Ashish Shelar : कोकणातल्या दशावतारासंदर्भात आज महाराष्ट्र विधानसभेत झाला एक उत्तम निर्णय, आशिष शेलारांकडून मोठी घोषणा
Tv9 Marathi July 08, 2026 05:45 PM

हापूस आंबा जशी कोकणची ओळख आहे, तसं दशावतार ही लोककला सुद्धा कोकणची एक मोठी ओळख आहे. कोकणच्या मातीतली ही लोककला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अमेरिकेपर्यंत प्रसिद्ध आहे. याच कोकणी दशावतारासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत आज एक मोठी घोषणा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात दशावताराचा विषय मांडला. “लावणी महोत्सव महाराष्ट्र सरकारमार्फत होतो. लावणी कलाकारांना पद्मभूषण देतात. दशावतार कलाकार संस्कृतीचे भाग आहेत. एक पुरस्कार मिळालेला नाही. तो का मिळाला नाही हे मंत्र्यांनी सांगावे” असा मुद्दा निलेश राणे यांनी मांडला. “ओळखपत्र मिळाले नाही तर योजना मिळणार कशी?. त्यांची नोंदच झाली नाही तर योजनेत घ्यायचे कसे? नमन हा रत्नागिरीतील विषय आहे. त्याची ही नोंद नाही. मंत्री स्वतः कोकणातील आहेत. गुगल फॉर्म आमच्या कलाकारांना कळत नाही. सोपी पद्धत करून द्या. मोठे कलाकार होऊन गेले. पुरस्कार नाही, अनुदान नाही. हा कलाकार जगणार कसा? 5 हजार रुपये टीम लीडर असतो, त्याने ठरवले तर मिळणार. नाहीतर मिळत नाहीत” या प्रश्नांकडे निलेश राणे यांनी लक्ष वेधलं.

त्यावर त्या खात्याचे मंत्री आशिष शेलारयांनी महत्वाची घोषणा केली. “1 जानेवारी 2008 चा जीआर आहे. पाच लोककलांसाठी प्रावधान केले. त्याच्यात लावणी सोबत दशावतारचा समावेश केला. त्यात अनुदान देण्याची भूमिका घेतली. भांडवली अनुदानासाठी ५० लाख रुपये व प्रयोगासाठी दशावतार मंडळांना १५ हजार रुपयांनुसार ३ लाख रुपये द्यायचा निर्णय घेतला” अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

अनुदानासंदर्भात काय ठरलं?

“कला पथकाला अनुदान मिळते, पण कलाकारांना अनुदान मिळत नाही. त्यामुळे २ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान वाढविण्याचा निर्णय करत आहोत. ४ कोटी ४० लाख रुपये अनुदान करू. कला पथक चालवणारे चालक आहेत. त्यांना ही मोठा खर्च असतो. या अनुदानातून प्रयोगासाठी तरतूद करत आहोत. त्यातील कलाकारांना व चालकांना अर्धे अर्धे अनुदान देऊ. १५ दिवसांच्या आत जीआर काढला जाईल. राज्य सांस्कृतिक पुरस्कारात दशावतार कलाकारांचा समावेश करण्याची घोषणा करतो” असं आशिष शेलार यांनी जाहीर केलं.

भास्कर जाधव यांनी काय मागणी केली?

“सिंधुदुर्ग मध्ये दशावतार आहे, तसं रत्नागिरी मध्ये नमन आहे. एका जिल्ह्याची स्वतंत्र भाषा असलेला एकमेव जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे, नमन आहे, भजन, भारुड व शिमग्यातील शंकासूर आहे. जाखडी नृत्य व शक्ती व तुऱ्याचे नृत्य आहे. त्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. या कलांचा अंतर्भाव करावा. सर्वांना सोबत घेणाऱ्या या कला आहेत, त्यांचा अंतर्भाव करणार का?. कलाकार म्हणून मानधन देणार का?. जिल्हाधिकारी ऐवजी बीडीओने कलाकार प्रमाणपत्र द्यावे” अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.