नालासोपारा : घरात पाणी शिरले, वीज गायब, गर्भवतीला ट्रॅक्टरवरुन रुग्णालयात नेले…
Tv9 Marathi July 08, 2026 07:45 PM

वसई – विरारमध्ये गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून वीज नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नालासोपारा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे.

गर्भवतीला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले

नालासोपाऱ्यात साचलेल्या पाण्यामुळे एका गर्भवती महिलेला देखील फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे नालासोपारा शहरात साचलेल्या पाण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांनी या गर्भवती महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले. या घटनेमुळे येथील विदारक स्थिती समजू शकते.

पाच दिवसांपासून घरात पाणी

विरार पश्चिम येथील रश्मीनगरामधील भद्रा सोसायटीत तळमजल्यातील घरात पाणी साचले. यात सुभाष पानसरे यांच्या घरात पाच दिवसापासून पाणी साचल्याने सर्व इलेक्ट्रिक वस्तूचे नुकसान झाले आहे. गेले अनेक दिवस लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, त्यामुळे येथील नागरिकांचा जगाशी संपर्क तुटला आहे. विरार पश्चिम रश्मी नगर मधील भद्रा सोसायटीत तळमजल्यातील घरात पाणी साचले होते. सुभाष पानसरे यांच्या घरात पाच दिवसापासून पाणी साचल्याने सर्व इलेक्ट्रिक वस्तूचे नुकसान झाले आहे.घरात लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, त्यामुळे सर्वांचा संपर्क तुटला आहे.

घरातील साहित्य उंचावर ठेवले

विरार पश्चिम रश्मी नगर मधील रेवा अपार्टमेंट मधील देखील हेमलता शेटगीर यांच्या घरात गेल्या चार दिवसापासून पाणी साचले आहे.या घरात तीन जण राहात आहेत. त्यातील दोघेजण वयस्कर आहेत, तर एक मुलगी आहे. रविवारपासून घरात पाणी साचल्याने घरात लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, पिण्याचे पाणी नाही त्यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत. या घरातील सर्व सामान या रहिवाशांनी उंचीवर ठेवले आहे. परंतू अजूनही येथे कोणीही मदतीला आले नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींची पाठ

विरार पश्चिम येथील एमबी इस्टेटमधील दत्त नगर रोड, मस्जिद गल्ली अजूनही पाण्याखाली आहे. आज पाचव्या दिवशी ही रस्त्यावर गुडघा ते कंबर इतके पाणी तुंबलेले आहे, येथे आजूबाजूच्या सोसायटी मध्येही पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असताना कोणताही लोकप्रतिनिधी येथे .फिरकलेला नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.