तात्या लांडगे
सोलापूर : १९९९-२००० मध्ये सुरू झालेल्या ५८४४ शाळा आणि ८९३६ वाढीव तुकड्या अजूनही १०० टक्के अनुदानित झालेल्या नाहीत. त्यावेळी विनाअनुदानित शाळांवर शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांची मुले आता नोकरीला लागली. तरीपण, या शिक्षकांना पूर्ण पगार सुरू झालेला नाही हे विशेष. यापूर्वी विनाअनुदानित शाळांना नैसर्गिक टप्पा अनुदान देण्याचा २०१४ मध्ये शासन निर्णय झाला. मात्र, १२ वर्षांनंतरही या शाळा-तुकड्या ४०, ६०, ८० टक्के अनुदानावरच आहेत. त्यामुळे दरवर्षी शाळा बंद ठेवून शिक्षक आंदोलने करीत आहेत. आताही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.
राज्यातील टप्पा अनुदानावरील पाच हजार ८४४ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांसह त्यांच्याकडील आठ हजार ९३६ वाढीव तुकड्यांवर सध्या ४९ हजार ५६२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळांना २० टक्के टप्पा तथा वाढीव अनुदानासाठी साधारणतः १४०० कोटी रुपये लागतात. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात देखील टप्पा अनुदानासाठी पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिक्षकांनी मुंबईचे आझाद मैदान गाठले होते.
आता पावसाळी अधिवेशन सुरू असून शिक्षकांना पुन्हा त्याच मागणीसाठी मुंबई गाठली आहे. आमदार जयंत आसगावकर यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांना टप्पा अनुदानासंदर्भात विचारणा केली, त्यावेळी ते शासनाकडे बोट दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासन शिक्षकांची मागणी पूर्ण करून निधीची तरतूद करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टप्पा अनुदानातील शाळा, तुकड्या
शाळा शाळांची संख्या तुकड्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
प्राथमिक ८२० ३,५१३ ८,६०२
माध्यमिक १,९८४ २,३८० २४,०२८
उच्च माध्यमिक ३,०४० ३,०४३ १६,९३२
एकूण ५,८४४ ८,९३६ ४९,५६२
शाळा बंद राहिल्यास कारवाई
सोलापूर जिल्ह्यात टप्पा अनुदानावरील ३१० शाळा आहेत. टप्पा अनुदानाच्या शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मुंबईत आंदोलनास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी सर्व शाळांवरील शिक्षकांसाठी पत्र काढले आहे. आंदोलनामुळे कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे पत्र आम्हीही संबंधित शाळांना दिले आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर