शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडणार? सरकारची भूमिका काय? विरोधकांचा दावा काय?
Tv9 Marathi July 10, 2026 07:45 PM

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, मात्र या अद्याप पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने असणाऱ्या या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्सबाबत डेटा आल्यावरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. हा डेटा येण्यासाठी 5 ते 6 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमीफी द्यायची की नाही याबाबतही निर्णय होणार आहे. अशातच आता विरोधकांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे, ते जाणून घेऊयात.

कोणत्याच अटी न ठेवता कर्जमाफी करावी – पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की, सरकार जेव्हा तारीख देतं याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती समजत आहे. तारीख दिली होती म्हणजे सरकारने तपासून घोषणा केली होती. आता जर तारीख वाढवत आहेत याचा अर्थ सरकारचं दिवाळं निघालेलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं. कोणत्याच अटी न ठेवता कर्जमाफी करावी.

रविकांत तुपकर यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या कर्जमाफीवर बोलताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी आमच्या सोबत 30 मिनिटे बैठकीत चर्चा केली. आम्ही त्यांना कर्जमाफी मधील जाचक अटींच्या संदर्भात सगळी माहिती दिली. त्यांनी या अटी बदलण्यात येतील असा आश्वासन दिले आहे. बघू आत्ता त्यांनी वेळ मागितला आहे, त्यामुळे त्यांनी अटी बदलल्या तर ठीक नाही तर आम्ही हजारोंच्या संख्येने मुंबईमध्ये आंदोलनाला येणार आहोत.

पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, बोगस बियाणे आणि जाचक अटींच्या संदर्भात आम्ही मुद्दे मांडले आहेत. बोगस बियाणांच्या संदर्भात बेलेबल कायदा आहे, पण आम्ही मागणी केली आहे नॉन बेलेबल कायदा निर्माण झाला पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नको आहे, आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पाहिजे पण आत्ता त्यांनी जी निर्णय घेतला आहे त्याची अमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी आम्ही 10-12 दिवस देत आहोत पण त्यांनी कर्जमाफी केली नाही तर आम्ही मुंबई मधे आंदोलन करू.

शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे – वडेट्टीवार

काँग्रेस नेचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफिची तारीख फक्त पुढे ढकलली जात आहे, शेतकऱ्यांची ही बनवाबनवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं कामं सुरु आहे. कॅबिनेटचा निर्णय कधी आला? नंतर अधिवेशन आलं, कधी देणार कर्जमाफी? खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.