महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार; मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कधी बदलणार? बड्या नेत्याने सगळं सांगितलं
Tv9 Marathi July 11, 2026 04:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात संपूर्ण कारभार येईल, असा दावा संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. परंतु एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा देखील राऊतांनी केला. संजय राऊत यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला केंद्रात देवेंद्रभाऊ हवेत. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे पाहिजे, अशी इच्छा आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना मनातील ही इच्छा बोलावून दाखवली. तसेच हा बदल पुढील काही महिन्यात पाहायला मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना स्थान मिळू शकते, असा दावा केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याला संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, ‘महाराष्ट्रात एकनाथ शिंदे राहिले पाहिजे. देशात देवेंद्र फडणवीस असावेत. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. संजय राऊतांची भविष्यवाणी कधीच खरी ठरली नाही. त्यांनी कोणत्या ज्योतिषाजवळ हात पाहिला, हे माहीत नाही. त्यामुळे त्याला अर्थ उरत नाही’.

‘परंतु एकंदरित चित्र असंच आहे. काही महिन्यात हा फेरबदल पाहायला मिळू शकतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देणे उचित राहील. एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपचं सरकार आलं. त्यांची भावना भाजपने ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोगस बियाणावरही भाष्य केलं.  ‘बोगस बियाणे पुरवठा करण्यांवर जन्मठेपाची शिक्षा दिली पाहिजे. बियाणे बोगस निघाल्यानंतर वर्ष वाया जाते. बियाण्याचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले की, केंद्रात देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात. तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे पाहायाला मिळू शकतात. तुम्हाला वाटू शकतं की मी आणखी कोणाचं नाव घेईन. परंतु जे चित्र दिसतंय, त्यानुसार विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते दिसताहेत. ते सर्वांशी योग्य संवाद साधून सांभाळून घेणारे नेते आहेत. परंतु एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.