Sanjay Raut : शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ, त्यांना भाजपसोबत जायचय, संजय राऊत म्हणाले..
Tv9 Marathi July 14, 2026 03:45 PM

“92 लाख लोकांची मतं विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करुन 3515 कोटी रुपयांचा अपहार केला जातो. तुमच्या बापाचे पैसे आहेत का?. आश्रम शाळांना निधी मिळत नाही, दिव्यांगाना भत्ता मिळत नाही. दिव्यांगांचे पैसे अडकले आहेत. 3515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला वापरता” अशा शब्दात संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ आहेत. त्यांना एनडीएसोबत जायचं आहे यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं.

“शरद पवारयांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आहे. त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. शिंदे गट, अजित पवार गट हे अमित शाह यांचे पक्ष आहेत. त्यांच्यात काय कुरबुरी आहेत, यावर शिवसेना नेत्याने का बोलाव?” असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार समर्थ आहेत

“शरद पवार मविआचे महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील घडामोडींवर आमचं लक्ष असणं सहाजिक आहे. मध्यंतरी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी एवढच सांगितलं की, बाहेर प्रसिद्ध माध्यमात जे सुरु आहे, त्या अफवा आहेत” असं राऊत यांनी सांगितलं. “सगळेच पक्ष यावेळेला अडचणीतून प्रवास करतायत. शिवसेनेपुढे, शरद पवारसाहेब, सुनेत्रा पवार जो गट संभाळतायत ते सुद्धा अडचणीतच आहे. ज्या कोणाकडे प्रचंड बहुमत आहे, ते अडचणीत नाहीत असं नाहीय. आम्ही आमच्या पक्षापुरता बोलू. आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल यावर काम करु. शरद पवार महत्वाचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाच्या अडचणी दूर करण्यासाठी ते समर्थ आहेत. अडचणी बाह्य शक्तींकडून निर्माण केल्या जात आहेत. या बाह्य शक्ती म्हणजे मोदी आणि शाह आहेत” असं राऊत म्हणाले.

विनोद तावडे-जयंत पाटील भेटीवर काय म्हणाले?

मध्यंतरी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट झाली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “जयंत पाटील हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमिकेवर काम करणारे नेते आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा आहे. ते ज्या भागातून येतात, ते क्रांतीकारक, स्वातंत्र्य चळवळीचा मोठा भाग आहे. ते त्या मुशीत तयार झालेले आहेत” “धार्मिक, जातीय शत्रुंसोबत जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. त्यांच्याकडे कामाची क्षमता आहे. आता जे विधिमंडळात आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त क्षमता आहे. कुठल्या गटात सहभागी होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही. संख्या 10 असली तरी बहुतांश आमदार हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.