Assam Flood News: आसाममध्ये पुराचा कहर; २४ तासांत १४ मृत्यू, मोदींकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही
esakal July 26, 2026 12:45 PM

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा ६१ वर पोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत चऱाईदेव जिल्ह्यात सात, शिवसागरमध्ये सहा आणि जोरहाटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. शिवसागर जिल्ह्यातील एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतील ७.०५ लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. गोलाघाट, चऱाईदेव, दिब्रुगड, होजाई, नागाव, बिश्वनाथ, जोरहाट, धेमाजी, शिवसागर, सोनितपूर, कामरूप (मेट्रो) आणि कार्बी आंगलाँग या जिल्ह्यांना फटका बसला आहे.

मोदींकडून मदतीची ग्वाही

मुख्यमंत्री सरमा यांनी शनिवारी ''एक्स''वरील पोस्टमध्ये सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून पूरस्थिती, नुकसान, सुरू असलेले मदतकार्य आणि राज्यासमोरील आव्हानांची माहिती घेतली. मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.

हत्तीचा पुरातून यशस्वी बचाव

नागालँडमधील नामसांग येथून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या पाळीव हत्तीचा आसामच्या शिवसागर जिल्ह्यात यशस्वी बचाव करण्यात आला. ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेल्या दिखोव नदीच्या पुरामुळे हा हत्ती वाहून आला होता. वन विभागाच्या पथकाने त्याला सुरक्षित बाहेर काढून उपचार सुरू केले.

गुजरातला अलर्ट

अहमदाबाद, ता. २५ (पीटीआय): गुजरातमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पाटण जिल्ह्यातील सांतलपूर आणि राधनपूर तालुक्यांत गेल्या २४ तासांत अनुक्रमे ३८१ मिमी आणि ३४२ मिमी पावसाची नोंद झाली. वाव-थराडमधील भाभर येथे २८७ मिमी पाऊस झाला.

Monsoon forecast: ‘एल निनो’ नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार: ‘सीपीसी’चा अंदाज; मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी राज्यातील काही भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने मदत व बचावकार्य अधिक वेगाने सुरू ठेवले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांसह लष्कर व तटरक्षक दलही बचावकार्यात सहभागी झाले आहेत. अहमदाबादच्या धोलका तालुक्यात १०३ जणांची, तर नवसारी जिल्ह्यात १२० जणांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. आतापर्यंत ४० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.