Eknath Shinde Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आम्ही विद्यार्थ्यांसोबतच आहोत, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असं सत्ताधारी एनडीएकडून सांगितलं जातंय. याच राजीनाम्यावर राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रधान यांचा राजीनाम्यावर भाष्य करताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना, धर्मेंद्र प्रधान यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भावनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिकता दिली आहे, असे म्हणत विद्यार्थ्यांचे दिल्लीतील आंदोलन हे अराजकीय होते. पण ते राजकीय आंदोलन करण्यात आलं, असा हल्लाबोल विरोधकांवर केला.
तसेच, काही लोकांनी आंदोलनात उडी घेतली. परंतु दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर न जाता काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले. पंतप्रधानांचे निवासस्थानाचा परिसरा हा उच्च सुरक्षेचा असतो. त्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर एसपीजीचा कायदा करण्यात आला. तेव्हापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात कोणतेही आंदोलन करता येत नाही. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना याबाबत कल्पना होती. तरीदेखील जाणीवपूर्वक तिथे आंदोलन करण्यात आले. हजारो, लाखो लोकांना तिथे बोलावण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी घातपात घडवून आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी नेहमी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेसारखी भारतात अराजकता पसवरण्याचा राहुल गांधी यांचा उद्देश होता. हा प्रकार निंदनीय आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारचे कृत्य करता कामा नये. कारण याआधीही आपण दोन पंतप्रधान गमावलेले आहेत. या प्रकाराचा मी कठोर शब्दात निषेध करतो. विरोधी पक्षनेते असतानाही ते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या असे आवाहन करत होते. आंदोलन तर जंतर मंतरवर होते. मोदी यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यामागे त्यांचा दुष्ट हेतू होता, असा आरोप करत ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी, असंही मत मांडलं.
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक महाराष्ट्रातहून दिल्लीत गेले. त्यांना महाराष्ट्रातील लोकांनी नाकारलं. ते दिल्लीत विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा-पेटवीची भाषा करत होते. आग लागलेली आहे. विझू देऊ नका, असे ते बोलत होते. देशात अराजकता पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आता ते निराश झाले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे यांच्यावर केला.