Maharashtra Rain News : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Maharashtra Rain) पुन्हा एकदा कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. अशातच अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाची धुव्वाधार बॅटिंग कायम राहणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील 22 जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यात रत्नागिरीला ऑरेंज, तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर तिकडे विदर्भातील 3 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तिकडे कोकणात देखील सरीवर सरी कोसळत असून पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पुढचे चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूणच महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून हवामान खात्याकडून 22 जिह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य परिस्थिती लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
Maharashtra Weather : राज्यातील 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 29 जुलै 2026 (बुधवार) विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 30 जुलै 2026, (गुरुवार) जळगाव, चंद्रपूर, पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Bhandara Rain : भंडाऱ्यात मध्यरात्री पावसाची जोरदार बॅटिंग
भंडारा जिल्ह्यात मागील 48 तासांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. काल दिवसभर पावसानं हजेरी लावल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उसंत घेतली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी या सातही तालुक्यात रात्रीला पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतामुक्त झालाय. भातपीक लागवड आता जोमात सुरू असून आज हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यानं प्रशासन सतर्क आहे.
Devendra Fadnavis on Palghar Rain : अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व मदतकार्यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमांतील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. त्यासाठी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा प्राधान्याने पूर्ववत कराव्यात. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वनियोजन करून युद्धपातळीवर काम करावे.असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ऊर्जा विभागांतर्गत महावितरण आणि संबंधित कंपन्यांनी वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत संरचनेची पुनर्रचना करावी. आपत्तीच्या काळातही अखंडित वीजपुरवठा राखता यावा, यासाठी तिन्ही वीज कंपन्यांनी आवश्यक उपाययोजना करत इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन करावे. तसेच, जलसाठे आणि पाण्याच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करावेत आणि त्यांचा विकास आराखड्यांमध्ये समावेश करावा, भविष्यात विकास परवानग्या देताना या अभ्यासाचा आधार घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या