जालना ते बीड मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस अर्थात लालपरी आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची मठ तांडा येथे जोरदार धडक झाली. लालपरी आणि ट्रकची ही धडक इतकी भीषण होती की बसच्या आणि ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे अंबड पासून 10 किमी वर गुरूवारी सकाळी अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जालना ते बीड मार्गावर झालेल्या अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. यापैकी सर्व प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगितले जात असून उपचारांसाठी या प्रवाशांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.