भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 91.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 376 रन्स केल्या. टीम इंडियासाठी ऑलराउंडर आर अश्विन याने सर्वाधिक धावा केल्या. अश्विनने 133 चेंडूत 113 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. जडेजाने 86 आणि यशस्वीने 56 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाने पहिल्या दिवशी झटपट 3 विकेट्स गमावल्यानंतर यशस्वीने ऋषभसह चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पंत 39 धावा करुन माखारी परतला. त्यानंतर यशस्वी आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. मात्र यानंतर दोघे सलग 2 षटकांमध्ये माघारी परतले.
त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनी हुशारीने टीम इंडियाचा डाव सावरला. अश्विन-जडेजा जोडीने 195 धावांची नाबाद भागीदारी केली. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 6 बाद 339 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी या दोघांना मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र 4 धावा जोडल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी सातवी विकेट गमावली. जडेजाला दुसऱ्या दिवशी एकही धाव करता आली नाही. जडेजाने 124 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 86 धावा केल्या. जडेजा आऊट झाल्याने या जोडीचं द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकलं.
अश्विन आणि जडेजा या दोघांनी सातव्या विकेटसाठी 241 चेंडूत 199 धावांची भागीदारी केली. या जोडीचं भागीदारीचं द्विशतक हुकलं असलं तरी यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला कमबॅक करता आलं. जडेजा आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने उर्वरित 3 विकेट्सही झटपट गमावल्या. जडेजानंतर आकाश दीप, अश्विन आणि जसप्रीत बुमराह तिघे आऊट झाले यासह टीम इंडियाचा डाव आटोपला.
अश्विन-जडेजाची 199 धावांची भागीदारी
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.