मुरुड : मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळू लागल्याने मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. आता हा किल्ला पुन्हा 2 ऑक्टोबरपासून म्हणजे गांधी जयंतीपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तत्पूर्वी किल्ल्याच्या साफसफाईला सुरूवात झाली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंजिरा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद केला जातो. कारण पर्यटकांना होडीतून किल्ल्यापर्यंत जावे लागते. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे पुन्हा पर्यटकांसाठी उघडले जातात. जंजिरा किल्ला २२ एकरावर पसरलेला असून त्याला 40 फूट उंच भिंतींचा वेढा आहे. समद्रातील अभेद्य किल्ला पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात.
– Advertisement –
हेही वाचा… Raigad Accident : रायगडमध्ये पुन्हा भीषण अपघात, तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू
आता तब्बल चार महिन्यांनंतर किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे. या चार महिन्यांत किल्ल्याच्या आतील भिंतीवर 5 ते 6 फूट उंच झाडे आणि गवत वाढले आहे. शिवाय सरपटणारे जनावरे असू शकतात. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने पुरातत्व विभागाने किल्ल्याची साफसफाई बुधवारपासून (18 सप्टेंबर) सुरू केली आहे.
– Advertisement –
हेही वाचा… One Nation One Election : निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतंय तर…; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी
पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या साफसफाईसाठी 20 कामगार लावले आहेत. मध्येच पावसाची सर येत असल्याने साफसफाईला उशीर होत आहे. आमच्या कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे स्वतः साफसफाई करत आहेत. लवकरात लवकर किल्ला सुरु करावा यांचे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करणार, अशी माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
जंजिरा किल्ल्याचं देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षण आहे. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक मुरुडमध्ये येतात. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी राजापुरी बंदरातून होडीतून जावे लागते. जंजिरा किल्ला पावसाळ्यात बंद केल्या जात असल्याने बोट व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होते. आता पुन्हा किल्ला पर्यटकांचे स्वागत करणार असल्याने वर्दळ वाढणार आहे.
(Edited by Avinash Chandane)