उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर September 21, 2024 12:43 PM

सांगोला: सध्या महाविकास आघाडीत जागावाटप पेक्षा मुख्यमंत्री कोण यावर चांगलेच वाक युद्ध समोर येत असताना शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टोलेबाजी केली आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे ही गोष्ट सातत्याने ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर येत असते. त्यामुळेच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून उलट सुलट दावे होत असतात. याबाबत शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्टता केल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या स्वप्नाला तडा जात असल्याचे दिसत आहे. अशावेळी संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत असताना शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)  निशाणा साधताना ते कधीही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत ही काळया दगडावरची रेघ असल्याचा टोला लगावला आहे. 

जागा वाटपात आम्हाला एकही जागा देऊ नका पण मला मुख्यमंत्री करा असेही उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणताना दिसतील असाही टोला शहाजी बापूंनी लगावला. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातली जनता संजय राऊत यांचे एकपात्री नाटक बघून वैतागली असल्याने आता तू काय बोलणार याकडे कोणीही लक्ष देत नाही असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. 

मला काही सांगायचे आहे या एकनाथ शिंदे यांच्यावरील येणाऱ्या नाटकाला आता ठाकरे सेना 50 खोके एकदम ओके या नाटकाने उत्तर देणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. यावर थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देताना, तुम्ही आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करा आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की 50 खोके घेतले मग मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेवून सांगतो की आम्ही खोके घेतले नाहीत. काय आहे ते एकदा जनतेला समजू द्या, घ्या तुम्ही आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून शपथ असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांवर येणारे नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर त्यांच्या भविष्यातील समृद्ध महाराष्ट्रावर आहे. ठाकरे यांचे नाटक म्हणजे निवडणूक स्टंट असेल असा टोलाही लगावला. 

 उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांनी आजवर केवळ एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांलर खोटे नाते आरोप करायचेच काम केले आहे. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न करतात ना महिलांचे ना बेरोजगारांचे ते फक्त संजय रावतांच्या जोडीने शिव्या देण्याचे काम करू शकतात असा टोलाही शहाजी बापू यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यांचे नाटक म्हणजे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही बापूंनी केली आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.