मराठ्यांना ओबीसी समजातून आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले होते. सलग आठ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर अखेर नवव्या दिवशी मनोज जरांगे यांनी माघार घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असून आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. नवव्या दिवशी त्यांची प्रकृती बरीच खालावली असताना त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मराठे एकत्र आले ही चांगली गोष्ट असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. मराठ्यांसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा शस्त्र उपसलं होतं. मात्र उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. आज दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान ते उपोषण सोडणार असल्याचे सांगितले जात आहे.