हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल – देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi September 27, 2024 05:45 AM

मुंबई, दि. २६ : जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार हे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृह येथे तीन कंपन्यांसोबत पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारामध्ये ८२ हजार २९९ कोटी रुपयांची गुंतवणूक असून त्यामुळे १८ हजार ४४० रोजगार निर्माण होणार आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या करारामुळे १५ हजार १०० मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. यापूर्वीही राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेतला आहे. यापूर्वी ५५ हजार ९७० मेगावॉट वीज निर्मितीसाठी करार करण्यात आले आहेत. यामध्ये ३ लाख कोटींची गुंतवणूक आणि ९० हजार ३९० इतकी रोजगार निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग आणि एसजेवीएन लिमिटेड, जेएसडब्लु एनर्जी लि. आणि मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रा लि. यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभाग व संबधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

पम्प्ड स्टोरेज सामंजस्य करारावर जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी आणि संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.