डोंबिवली : भाजपाने आपली पहिली यादी रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) जाहीर केल्यानंतर आता हळूहळू सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच आपली काही नावे सभांच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यानंतर आता डोंबिवलीमधील एका कार्यक्रमातून त्यांनी विद्यमान आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव या दोन शिलेदारांच्या नावांची घोषणा केली आहे. डोंबिवली येथे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे सोमवारी (ता. 21 ऑक्टोबर) उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी त्यांनी ही घोषणा केली. तर आज किंवा उद्या मनसेकडून अधिकृतपणे यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Raj Thackeray announces names of Avinash Jadhav and Raju Patil for Maharashtra Assembly Election 2024)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला मनसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या कार्यालयाचे राज ठाकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. येत्या 24 तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे, असेही राज ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
– Advertisement –
हेही वाचा… Election 2024 : उद्धव ठाकरेंचे टेंन्शन वाढले, संभाजी ब्रिगेडची मराठवाडा, विदर्भातील जागांची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच आपली काही नावे सभांच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ज्यामध्ये शिवडी विधानसभेकून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वरळी विधानसभेतूनही संदीप देशापांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मनसेने ही नावे जाहीर करत पहिली यादी जाहीर केल्याचे बालले जाते. त्यामुळे आज किंवा उद्या मनसे आपली दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये मनसे नेते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याही नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर 2019 मध्ये मनसेने ज्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, त्यांनाच पुन्हा संधी देण्यात येऊ शकते, असेही बोलले जात आहे.