मुंबई क्रिकेट टीमने यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात देशांतर्गत हंगामाची जबरदस्त सुरुवात केली. मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला पराभूत करत इराणी कपवर आपलं नाव कोरलं. मात्र त्यानंतर गतविजेत्या मुंबईला रणजी ट्रॉफीतील सलामीच्या सामन्यात बडोद्याने 27 वर्षांनी पराभूत करत अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राला पराभूत केलं. त्यानंतर आता मुंबई त्रिपुरा विरुद्ध खेळणार आहे. मुंबई क्रिकेटने त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यासाठी संघ जाहीर केला. सलामीवीर पृथ्वी शॉ याला त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यासाठी डच्चू देण्यात आला आहे. त्यानंतर पृथ्वीची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. मुंबई विरुद्ध त्रिपुरा यांच्यातील सामना हा 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
पृथ्वीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 2 सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. पृथ्वीने सलग 4 डावांमध्ये अनु्क्रमे 7, 12, 1 आणि 39 अशा धावा केल्या. त्यामुळे निवड समितीने पृथ्वीचा त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघात समावेश केला नाही. एमसीएने पृथ्वीला विश्रांती दिल्याचं म्हटलंय. निवड समिती आणि प्रशिक्षकांनी पृथ्वीसोबत चर्चा करुन त्याला कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला दिलाय. तसेच फिटनेसवरही विशेष लक्ष देण्याची सूचना एमसीएने केली आहे.
त्यानंतर पृथ्वीने इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. पृथ्वीने या इंस्टा स्टोरीतून आपली खदखद व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वीने “मला विश्रांतीची गरज, धन्यवाद”. पृथ्वीने या इंस्टा स्टोरीत फेक स्माईलचा इशारा करणारी इमोजीचा वापर केला आहे.
पृथ्वीची इंस्टो स्टोरी
दरम्यान पृथ्वी टीम इंडियातून अनेक वर्षांपासून बाहेर आहे. पृथ्वी 2021 पासून कमबॅकच्या प्रयत्नात आहे. मात्र आता त्याचं मुंबई टीममधील स्थानही निश्चित नाही. पृथ्वीने आतापर्यंत टीम इंडियाचं 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी 20i मध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कप्तान), आयुष म्हात्रे, अंगीकृष रघुवंशी, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तमोरे, सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, कर्ष कोठारी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, जुनेद खान आणि रॉयस्टन डायस.