मत्स्य आयुक्त कार्यालयावर मच्छीमार धडकले
esakal February 13, 2025 11:45 PM

rat१३p२६.jpg-
२५N४५०५३
रत्नागिरी- जिल्ह्यातील मच्छीमारांवर सागरी हद्दीसंदर्भात लाधलेल्या निर्बंधाविरुद्ध मच्छीमार सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले.
--
मत्स्य आयुक्त कार्यालयावर मच्छीमार धडकले
मासेमारी बंदीविरोधात नाराजी ; हवाई गस्तीत अन्याय होत असल्याची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : समुद्रात दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास घातलेल्या बंदीविरोधात आज रत्नागिरीतील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली. ड्रोनद्वारे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या हवाई गस्तीत दहा वावाच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांची छायाचित्रे घेतली जातात आणि मच्छीमारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या संदर्भात लक्ष घालून न्याय मिळवून द्या, अशी विनंती मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली. या वेळी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देऊ, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांना दिले.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी १० जानेवारीपासून समुद्रकिनार्यावर ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांची आज भेट घेतली. मच्छीमार नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, काँग्रेस नेते दीपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी ड्रोन कारवाईसंदर्भात व्यथा मांडल्या. रत्नागिरी समुद्रकिनारा वगळता रायगड व इतर समुद्रकिनारी पाच वाव अंतराचा नियम आहे. रत्नागिरीत दहा वाव पुढील अंतराच्या समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मच्छीमारांवर अन्याय आहे. कर्नाटकातील मलपी बंदरावर अद्ययावत नौका येथील मासळी खरवडून नेत आहेत. त्यांच्यावर धडक कारवाई होण्याची गरज आहे. यावर गेल्या दोन वर्षात मलपीच्या दोन अद्ययावत नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा खुलासा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कुवेसकर आणि परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी केला. समुद्रात वारा असेल तर दहा वावाच्या बाहेर मासेमारी करणे फिशिंग नौकाना धोक्याचे असते. अशावेळी रत्नागिरी समुद्रात मासेमारी करण्याचे अंतर ५ वावाच्या पुढे असावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या संदर्भात निवेदन देण्यात यावे. ते निवेदन आयुक्त कार्यालयाला पाठवले जाईल, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी आश्वासन दिले.
---
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मत्स्यविभागाने चार झोन पाडलेले आहेत. या झोनमुळे जिल्ह्याच्या मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाबाबतचे वृत्त आज ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्याची दखल मच्छीमारांनीही घेतली. याबाबत काही मच्छीमारांनी ''सकाळ''ला धन्यवाद दिले. हा प्रश्न मांडण्यासाठी मच्छीमारांनी आज सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली आणि या अन्यायाबाबत दादही मागितली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.