कुडाळ - वैभव नाईक जेव्हा आमदार होते, तेव्हा बिडवलकर खून प्रकरणाचा गुन्हा घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होती, मग या गुन्ह्याची माहिती नक्कीच त्यांना होती. मग त्यावेळी त्यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्यामुळे नाईक यांना या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट पैसे देत असल्याचा संशय निर्माण होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. यामध्ये आमचे कोणी पदाधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुन्हा लपवला म्हणून माजी आमदार नाईक यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या खून प्रकरणानंतर माजी आमदार नाईक यांनी आमदार राणे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात आमदार राणे यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद घेतली.
आमदार राणे म्हणाले, ‘‘नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जो व्हिडिओ प्रसारित केला तो कधीचा आहे, हे पडताळणे गरजेचे आहे. ही घटना २०२३ मध्ये झाली, त्यावेळी वैभव नाईक आमदार होते. ते संविधानिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात या गुन्ह्याची दबक्या आवाजात चर्चा होती.
जर या गुन्ह्याची माहिती त्यांच्यापर्यंत आली होती, तर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देणे गरजेचे होते; मात्र तसे न करता आता ९ एप्रिलला बिडवलकर यांच्या मामीने तक्रार दाखल केल्यानंतर नाईक यांनी १४ एप्रिलला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ प्रसारित केला आणि १६ एप्रिलला पोलिस अधीक्षकांना शिष्टमंडळाद्वारे जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
त्यावेळी त्यांच्या पक्षामध्ये सिद्धेश शिरसाट कार्यरत होता. त्याला संरक्षण देण्यासाठी ही घटना नाईक यांनी लपवली असावी, असा संशय निर्माण होत आहे. त्यासाठी त्यांनी शिरसाटकडून पैसाही घेतला असेल, असा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. वैभव नाईक आमदार असताना कबड्डी स्पर्धेच्या आयोजनावेळी या प्रकरणातील माणगाव येथील नार्वेकर हा संशयिती त्यांच्या समवेत होता, तर अमोल शिरसाट हा नाईक यांच्यासमवेत नाचतानाचा फोटो आहे.
आमदारकीच्या काळात दारू व्यवसायिकांसह अनैतिक धंद्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून पैसे जमा करण्याचा धंदा वैभव नाईक यांचा होता. आता हा धंदा बंद झाल्यामुळे ते आरोप करीत आहेत. त्यांनी अमली पदार्थविरोधात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे अमली पदार्थ विकणाऱ्यांसोबत त्यांचे लागेबंध आहेत की काय, असाही संशय निर्माण होत आहे.’'
ते म्हणाले, '‘भाजपनंतर मी शिंदे शिवसेनेत आलो, त्याला अवघे ८ महिने झाले आणि ही घटना २०२३ मध्ये घडली आहे. एखाद्या घटनेचे भांडवल करून राजकारण करण्याची संस्कृती नाईक यांची आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये दोन सामाजिक कामे त्यांनी केली, ती कामे म्हणजे 'चिपी विमानतळाला टाळे ठोकणार' ही घोषणा आणि आता बिडवलकर खून प्रकरणावरून सुरू केलेले राजकारण. या प्रकरणात त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
यासाठी पोलिस अधीक्षकांनी २००९ ते २०२५ पर्यंतच्या सर्व सीडीआरची तपासणी करावी. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई करावी.’’ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
बॅनरवर फोटो असणे म्हणजे आरोपी नाही
आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना अनेक व्यक्ती भेटत असतात. बॅनरही लावले जातात. त्यांच्यासोबत किंवा बॅनरवर फोटो असणे म्हणजे आरोपी होत नाही. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले फोटो प्रसारित करून या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न नाईक करत आहेत. त्यांच्यासोबत सुध्दा या प्रकरणातील आरोपींचे अनेक फोटो आहेत. त्यामुळे नाईक यांनी आता खालच्या थराचे राजकारण सोडावे आणि विकासात्मक राजकारण करावे, असे आमदार राणे यांनी सांगितले.